Asian Games 2023 : चीनमधील हांगझू येथे 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय खेळाडूंनीही विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवलाय. गतवेळपेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न भारतीय खेळाडूंचा असेल. गेल्या हंगमात भारताने एकूण  70 पदकावर नाव कोरले होते. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 655 भारतीय खेळाडू भाग घेत आहेत. 

हरमनप्रीत आणि लवलीना भारताचे ध्वजवाहक:  
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन 23 सप्टेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमात पुरुष हॉकी टीमचा कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि बॉक्सर लवलीना बोरगोहेन भारताचे ध्वजवाहक असतील. विश्व चॅम्पियन नीरज चोप्रा , भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघ, हॉकी संघ बॉक्सर निखत जरीन आणि मीराबाई चानू पदकाचे प्रबळ दावेदार आहेत.

गेल्या हंगामात भारत आठव्या क्रमांकावर :

आशियाई क्रीडा स्पर्धेचे गतवेळी आयोजन  2018 मध्ये जकार्ता येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत भारताने 16 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य पदक पटकावली होती. भारतीय संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता. ही कामगिरी सुधारण्याचे आव्हान भारतीय खेळाडूपुढे असेल.  जकार्ता येथे झालल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनने 132 सुवर्ण, 92 रौप्य आणि 65 कांस्यसह 289 पदके पटकावली होती. जपान 205 पदकासह दुसऱ्या स्थानावर होता. तर दक्षिण कोरिया 177 पदकासंह तिसऱ्या स्थानावर राहिला होता. यंदा भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.  

एशियन गेम्समध्ये आतापर्यंत किती पदके जिंकली ?

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 155 सुवर्ण पदके जिंकली आहेत.  भारताने बॅडमिंटनमध्ये आतापर्यंत दहा पदके पटकावली आहेत. त्यामध्ये एक रौप्य आणि नऊ कांस्य पदकाचा समावेश आहे. भारताच्या कोणत्याही शटलरला आतापर्यंत सुवर्णपदक पटकावता आले नाही. भारताला पहिल्या सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 672 पदके जिंकली आहेत. त्यामध्ये 155 सुवर्ण, 201 रौप्य आणि  316 कांस्य पदकाचा समावेश आहे.  

भारतने कोणत्या वर्षी किती सुवर्ण पदके जिंकली? 

वर्ष सुवर्ण
1951 15
1954 5
1958 5
1962 10
1966 7
1970 6
1974 4
1978 11
1982 13
1986 5
1990 1
1994 4
1998 7
2002 11
2006 10
2010 14
2014 11
2018 16

सर्वोत्कृष्ट कामगिरी - 

पीटी उषा :

पीटी उषाने भारताकडून आतापर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या नावावर एकूण 11 पदके आहेत. पीटी उषाने चार सुवर्ण आणि सात रौप्य पदके जिंकली आहेत.   

लिएंडर पेस : 

भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने आशियाई क्रीडा स्पर्धेत पाच सुवर्णपदके जिंकली आहेत, जे कोणत्याही भारतीयाने जिंकलेले सर्वाधिक सुवर्णपदक आहे. याशिवाय त्याने तीन रौप्यपदकेही जिंकली आहेत. 

जसपाल राणा :

नेमबाज जसपाल राणा याने आशियाई क्रीडा स्पर्धेतील चार सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत.