मुंबई : 'दादा' नावाने परिचित असलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुलीचा आज वाढदिवस. गांगुली भारतीय क्रिकेटमधला पहिला असा कॅप्टन ठरला ज्याने संघाला परदेशी भूमिवर विजयी होण्याचा विश्वास दिला. 'द प्रिंस ऑफ कोलकाता’, अर्थात दादा आज 48 वर्षांचा झाला आहे. गांगुलीनं प्रामुख्याने 2000 च्या दशकाच्या सुरुवातील टीम इंडियाची धुरा सांभाळली.


हा काळ भारतील क्रिकेटसाठी संक्रमणाचा काळ होता. भारतीय संघाचं नेतृत्व घेण्यास कोणी धजावत नव्हतं. संघातील काही खेळाडू फिक्सिंगमध्ये अडकले होते. तेव्हा संघाचे नेतृत्व करत भारतीय क्रिकेटला मार्गावर आणण्याचं काम दादानं केलं. आपल्या आक्रमक स्टाईलने गांगुलीनं संघाला अनेक विजय मिळवून दिले.

गांगुलीच्या नेतृत्वात 'मेन इन ब्लू' म्हणजे टीम इंडियाने 146 एकदिवसीय सामने खेळले. त्यात 76 सामने जिंकले तर 65 सामने हरले. दादाची एकदिवसीय सामन्यातील विजयाची सरासरी 53.90 इतकी होती.

कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नेतृत्वात टीम इंडियानं 49 पैकी 21 सामने जिंकले तर 13 सामने हरले तर 15 सामने अनिर्णित राहीले. या काळात विजयाची सरासरी तब्बल 42.85 राहिली.

दादाची सर्वात लक्षात राहील अशी आठवण म्हणजे लॉर्डसवर शर्ट उतरवून केलेलं सेलिब्रेशन. इंग्लंडविरुद्ध 2002 साली नेटवेस्ट फायनल जहां जिंकल्यानंतर दादाने आपली जर्सी उतरवली आणि एकच जल्लोष केला. त्यानंतर भारतीय टीम विश्वचषक 2003 च्या फायनलला देखील पोहोचली. 1983 नंतर दुसऱ्यांदा भारतीय संघाला वर्ल्डकपच्या समीप दादानेच नेऊन ठेवलं होतं.

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आज देखील तो भारतीय क्रिकेटसाठी महत्वपूर्ण योगदान देत आहे. पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशननंतर आता बीसीसीआयच्या अध्यक्ष होऊन आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.

गांगुलीने 113 टेस्ट आणि 311 एकदिवसीय सामने खेळले. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 42.18 च्या सरासरीने 7,212 धावा आहेत. कसोटीत त्यानं 16 शतकं लगावली आहेत. विशेष म्हणजे आपल्या पदार्पणाच्या कसोटीत त्यानं शतक ठोकलं होतं. कसोटीत त्यानं 35 अर्धशतक आणि 32 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

एकदिवसीय सामन्यात गांगुलीनं 22 शतकं आणि 72 अर्धशतकांसह 40.73 च्या सरासरीनं 11,363 धावा केल्या तर 100 विकेट्स देखील त्यानं घेतल्या आहेत.