नवी दिल्ली : धडाकेबाज फलंदाज गौतम गंभीरने दिल्लीच्या रणजी संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. गेल्या चार मोसमात गंभीरने दिल्लीच्या रणजी संघाचं नेतृत्त्व केलं होतं. यापुढे दिल्लीच्या नेतृत्त्वाची धुरा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या खांद्यावर असेल.


गौतम गंभीरने कर्णधारपद सोडण्याबाबत दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) पदाधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. शिवाय, संघात खेळत राहणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे, अशी माहिती डीडीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

दिल्लीचा संघ मागील मोसमात साखळी फेरीतच गारद झाला होता. गंभीर आणि प्रशिक्षक के पी भास्कर यांच्यातील वादाचा फटका दिल्ली संघाला बसल्याचं बोललं जातं. त्यावेळी दिल्ली क्रिकेटच्या प्रशासकीय समितीने गंभीरला शिक्षा सुनावत, चार सामन्यांसाठी निलंबितही केले होते.   

यंदाच्या मोसमासाठी दिल्लीचा रणजी संघ असा असेल:

इशांत शर्मा (कर्णधार), गौतम गंभीर, उन्मुक्त चंद, नितीश राणा, ध्रुव शौरी, मिलिंद कुमार, हिंमत सिंह, कृणाल चंदेला, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मनन शर्मा, विकास शर्मा, पुलकित नारंग, नवदीप सैनी, विकास टोकस आणि कुलवंत खेजरोलिया.