दम्बुला :  टीम इंडियानं 9 गडी राखून श्रीलंकेविरुद्धचा पहिलाच वनडे सामना सहज खिशात टाकला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 नं बढत घेतली. या शानदार कामगिरीनंतरही कर्णधार विराट कोहलीनं येत्या काही सामन्यांमध्ये संघात मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत.


सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, 'भारतीय संघ 2019 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे सर्व खेळाडू्ंना संधी मिळावी यासाठी संघात काही बदल केले जातील.'

'आम्ही इथं प्रयोग करणार आहोत. त्यामुळे यापुढे तुम्हाला नवे बदल पाहायला मिळतील. यामध्ये सर्व खेळाडूंना सहभागी करुन घेतलं जाईल. मात्र, असं असलं तरी संघाचा ताळमेळ बिघडणार नाही.' असं विराट म्हणाला.

(AP Photo/Eranga Jayawardena)

'अक्षर पटेल चांगली फलंदाजीही करतो आणि तो एक चपळ क्षेत्ररक्षकही आहे. त्यामुळे पुढील सामन्यात आणखी एक वेगवान गोलंदाज किंवा तीन फिरकी गोलंदाज खेळवण्यात येतील.' असंही कोहली म्हणाला.

येत्या काही महिन्यात भारतीय संघात काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. युवराज सिंहला संघाबाहेर ठेऊन टीम मॅनेजमेंटनं सगळ्यांनाच इशारा दिला आहे. त्यामुळे आता यापुढे प्रत्येक खेळाडूला मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागणार आहे.