नवी दिल्ली : भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून भारताचा ऑफ स्पिनर हरभजनसिंहचं खेलरत्न तर धावपटू द्युती चंदचं नाव अर्जुन पुरस्कारासाठीच्या यादीतून रद्द करण्यात आले आहे. पंजाब राज्य शासनाकडून हरभजनची यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. तर ओदिशा सरकारने अर्जुन पुरस्कारासाठी द्युतीच्या नावाची शिफारस केली होती. परंतु या दोघांचा अर्ज दिलेल्या मुदतीत क्रीडा मंत्रालयाकडे दाखल न झाल्याने त्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही.


द्युतीनं गेल्या वर्षी एशियाडमध्ये दोन रौप्य तर यंदाच्या दोहा आशियाई स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत हरभजनने 711 बळी घेतले होते. यामध्ये कसोटीतल्या 417, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 269 आणि टी20 मधल्या 25 बळींचा समावेश आहे. आपआपल्या क्रीडा प्रकारातील योगदानाबद्दल या दोघांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती.