कोलंबो : दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराने कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदाचा करंडक मिळवून दिला. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं. कोलंबोत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात बांगलादेशने भारताला विजयासाठी 167 धावांचं लक्ष्य दिलं होतं.


दरम्यान, दमदार फॉर्मात असलेल्या दिनेश कार्तिकला आता संघातून बाहेर होण्याची भीती सतावत आहे. एक खराब मालिका आपल्याला संघापासून दूर नेईल, असं दिनेश कार्तिक अंतिम सामन्यापूर्वी म्हणाला होता. ''एका मालिकेतील खराब कामगिरी मला संघातून बाहेर करेन. त्यामुळे प्रत्येक वेळी सर्वोत्कृष्ट खेळी करावी लागेल. माझ्यावर दबाव असल्याची मला पूर्ण जाणीव आहे आणि त्याचा सामना करावा लागेल,'' असं दिनेश कार्तिकने सांगितलं होतं.

दिनेश कार्तिक मैदानात उतरला त्या वेळी टीम इंडियाला विजयासाठी बारा चेंडूंत तब्बल 34 धावांची आवश्यकता होती. समोर नवखा विजय शंकर चाचपडत उभा होता. पण टीम इंडियाच्या सुदैवाने दिनेश कार्तिकला स्ट्राईक मिळाला आणि त्याने रुबेल हुसेनवर हल्ला चढवला. दिनेश कार्तिकने एकोणिसाव्या षटकात 22 धावांची लूट केली. त्यामुळे टीम इंडियाला अखेरच्या षटकांत सहा चेंडूंवर बारा धावांची गरज होती. अखेरच्या चेंडूवर षटाकर ठोकून दिनेश कार्तिकने भारताला विजय मिळवून दिला.

दिनेश कार्तिकवर या मालिकेत महेंद्रसिंह धोनीच्या जागी विकेटकीपिंगची जबाबदारी देण्यात आली होती. 32 वर्षीय दिनेश कार्तिकच्या करिअरची सुरुवात धोनीच्या तीन महिने अगोदर झाली होती. मात्र करिअरमध्ये कार्तिकने अनेक चढ-उतार अनुभवले.

संबंधित बातम्या :

विजयी षटकार आणि श्वास रोखून धरायला लावणारे अखेरचे सहा चेंडू


दिनेश कार्तिकचा विजयी षटकार, तिरंगी मालिका भारताच्या खिशात