नवी दिल्ली: टीम इंडियाचा क्रिकेटपटू गौतम गंभीरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.


एका रेस्टोरंट-बारने त्यांच्या पबच्या जाहिरातीसाठी गौतम गंभीर हे नाव वापरलं होतं, ते हटवण्याची मागणी गंभीरने याचिकेद्वारे केली होती. मात्र कोर्टाने त्याला नकार दिला.

त्याचं कारण म्हणजे त्या पबच्या मालकाचं नावही गौतम गंभीरच आहे. त्यामुळे कोर्टाने ते नाव न वापरण्याची गंभीरची मागणी फेटाळली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाक परिसरात डीएसपी आणि कंपनीचे दोन पब आहेत. घुंघरू आणि हवालात अशी त्यांची नावं आहेत.

महत्त्वाचं म्हणजे या पब मालकाचंही नाव गौतम गंभीर आहे. या पबची जाहिरात ‘बाय गौतम गंभीर’ अशी केली जाते.

मात्र हे पब आपलेच आहेत अशी लोकांची धारणा होत आहे, त्यामुळे गौतम गंभीर हे नाव हटवावं, अशी मागणी क्रिकेटपटू गंभीरने केली होती. या नावामुळे माझ्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचंही गंभीरने याचिकेत म्हटलं होतं.

पण कंपनीने कोर्टात दावा केला की, मालकाचं नावही गौतम गंभीर असल्यामुळे आम्ही तेच वापरत आहोत.

कोर्टाने कंपनीचं म्हणणं मान्य करत, क्रिकेटपटू गंभीरला झटका देत, त्याची याचिका फेटाळली.

गंभीर टीम इंडियातून बाहेर

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करणारा गौतम गंभीर सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. गंभीर शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2016 मध्ये, तर शेवटचा वन डे सामना जानेवारी 2013 मध्ये खेळला आहे.

गंभीर हा भारताने 2007 मध्ये जिंकलेल्या टी 20 आणि 2011 च्या वन डे विश्वविजेत्या संघाचा सदस्य होता.

गंभीरने 58 कसोटीत 9 शतकं, 22 अर्धशतकांसह 4154 धावा केल्या आहेत.

तर त्याने 147 वन डेत 11 शतकं आणि 34  अर्धशतकं ठोकली असून, 5238 धावा केल्या आहेत.

याशिवाय गंभीरने 37 टी ट्वेण्टीत 7 अर्धशतकांसह 932 धावा केल्या आहेत.