कल्याण : शालेय क्रिकेटमध्ये तब्बल 1009 धावा करुन विश्वविक्रम करणारा कल्याणचा प्रणव धनावडे आता विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरणार आहे. कारण प्रणवच्या या विश्वविक्रमाचा धडा सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.


प्रणव धनावडेने 2016 साली शालेय क्रिकेटमध्ये खेळताना तब्बल 1009 धावांचा डोंगर उभा केला होता. त्याच्या या विश्वविक्रमी कामगिरीची त्यावेळी जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली होती. यानंतर दोन वर्ष आपल्या खेळात व्यस्त असलेला आणि फारसा प्रकाशझोतात नसलेला प्रणव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण प्रणवच्या विश्वविक्रमी कामगिरीवर आधारित धड्याचा सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.



इयत्ता तिसरीच्या हिंदीच्या पुस्तकात हा धडा घेण्यात आला असून त्याच्या प्रवासातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. खुद्द प्रणवला याबाबत कुठलीही कल्पना नव्हती. त्याच्या मित्रांनी फोन करुन त्याला याबाबत माहिती दिली. यानंतर त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या सगळ्यानंतर आपली जबाबदारी वाढली असून भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल, असं प्रणवने सांगितलं.