नवी दिल्ली : टीम इंडियाचा क्रिकेटर परविंदर अवानावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पाच जणांनी ग्रेटर नोएडात परविंदर अवानावर हल्ला केला आणि घटना स्थळावरुन पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली.


परविंदर अवाना हरिद्वारहून परतत असताना ही घटना घडली. हल्लेखोर जवळच्याच घनगोला या गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

हरिद्वारहून परतताना परविंदर अवानाच्या गाडीने दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक केलं, ज्यामध्ये पाच जण होते. त्यानंतर अवाना आणि समोरच्या गटामध्ये शाब्दिक चकमक झाली. अवानाने यातून माघार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यावर हल्ला करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अवानावर यापूर्वीही हल्ला झाला होता. 2014 मध्ये पार्किंगच्या मुद्द्यावरुन एका पोलिसाकडून अवानाला मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्यात आलं होतं.

अवानाने 2012 साली इंग्लंविरुद्ध टी-20 तून टीम इंडियात पदार्पण केलं होतं. मात्र त्यानंतर त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. अवाना अखेरचा आयपीएल 2016 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. दिल्लीच्या संघाकडून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 62 सामने खळले आहेत.