नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांत केवळ 227 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने 48 षटकांत चार गडी गमावत हे आवाहन सहज पार केलं.
टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने या सामन्यात 128 चेंडूंमध्ये शतक साजरं केलं. रोहितचं वन डे कारकीर्दीतलं हे तेविसावं आणि विश्वचषकातलं दुसरं शतक ठरलं. या सामन्यात भारतीय विजयाच्या आशा या रोहितवरच केंद्रित झाल्या होत्या. रोहित 122 धावांवर नाबाद राहिला. रोहित आणि धोनी या जोडीने विजयासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले.
कोहली अवघ्या 18 धावांवर बाद झाला, तेव्हा टीम इंडिया दोन बाद 54 धावांवर होती. विकेटकीपर क्विंटन डी कॉकने कर्णधाराचा झेल घेतल्यानंतर उपकर्णधार रोहित शर्मावरच सर्व मदार होती.
याआधी, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 227 धावांत रोखून विश्वचषक सामन्यावर वर्चस्व मिळवल्याचं चित्र दिसत होतं. भारताकडून युजवेंद्र चहलने चार, जसप्रीत बुमराने आणि भुवनेश्वरने प्रत्येकी दोन, तर कुलदीप यादवने एक विकेट काढली.
बुमराहने चौथ्या आणि सहाव्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांना तंबूत पाठवलं. सहाव्या षटकाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेची स्थिती दोन बाद 24 अशी झाली होती. कर्णधार फाफ डू प्लेसिसने डुसेनच्या जोडीने 54 धावांची भागिदारी रचली होती, मात्र चहलने दक्षिण आफ्रिकेचं डाव सावरण्याचं स्वप्न भंग केलं. चहलने एकाच षटकात दोघा फलंदाजांना माघारी धाडलं.
साऊदम्पटनमधल्या रोज बाऊल स्टेडियमवर टीम इंडियाचा सलामीचा सामना रंगला. दक्षिण आफ्रिकेचा यंदाच्या विश्वचषकातला हा सलग तिसरा पराभव ठरला. याआधी इंग्लंड आणि बांगलादेशकडून दक्षिण आफ्रिकेला पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र विजयाचं खातं उघडण्याचं दक्षिण आफ्रिकेचं स्वप्न अधुरंच राहिलं.