BCCI Announced Team India Squad For Asia Cup 2025 : आशिया कप 2025 साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर झाला. निवडकर्त्यांनी श्रेयस अय्यरला संघात स्थान न देऊन पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. शुभमन गिल टी-20 संघात परतला आहे, परंतु अय्यर निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरला आहे. देशांतर्गत क्रिकेट तसेच आयपीएलमध्ये आणि त्याआधी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रेयसने दर्जेदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची आशिया कपसाठी निवड होईल अशी अपेक्षा होती. परंतु निवडकर्त्यांनी त्याला पूर्णपणे डावललं आहे.
अय्यरला पुन्हा दुर्लक्षित करण्यात
देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करूनही, श्रेयस अय्यरला आशिया कप 2025 (Why Shreyas Iyer Was Not Picked For Asia Cup) संघातून दुर्लक्षित करण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अय्यर भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. यासोबतच, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही अय्यरची बॅट गर्जली होती.
अभिषेक नायरचा BCCI ला थेट सवाल
या निर्णयावर माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी निवड समितीवर थेट सवाल केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, "श्रेयससारखा खेळाडू 20 जणांच्या यादीत (15 + 5 राखीव) सुद्धा नाही, हे अजिबात समजण्यासारखं नाही. कदाचित निवडकर्ते त्याला टी-20 च्या दृष्टिकोनातून पाहत नसतील. अनेकदा निवड ही खेळाडूच्या फॉर्मपेक्षा निवडकर्त्यांच्या पसंतीवर अवलंबून असते. कदाचित श्रेयस कोणाला कमी आवडत असेल आणि दुसरा खेळाडू जास्त आवडत असेल. हाच त्याला डावलण्याचा पॉइंट ठरला असावा."
श्रेयसला वगळल्याने चाहत्यांमध्येही नाराजी...
श्रेयसला वगळल्याने चाहत्यांमध्येही नाराजी आहे. तो सध्या तुफान फॉर्ममध्ये असताना त्याला बाहेर ठेवणं ही मोठी चूक असल्याचं अनेकांचे मत आहे. त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 51 सामन्यांमध्ये 1104 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 8 अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान, आशिया कपसाठी निवडलेल्या संघात शुभमन गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर जसप्रीत बुमराह संघात परतला आहे. पण श्रेयस अय्यरसारख्या विश्वासार्ह खेळाडूला डावलल्याने या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
आशिया कपसाठी भारतीय संघ
- फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
- अष्टपैलू : हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल.
- यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा.
- गोलंदाज : जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.
आशिया कपमध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक
- 10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
- 14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
- 19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान