What If IND vs SL 1st Test Ends in a Draw WTC Final Qualification : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे. पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात करून श्रीलंकेवर दबाव निर्माण केला. मात्र, पावसाने सामन्यात वारंवार व्यत्यय आणल्याने आता या कसोटीच्या निकालावरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) समीकरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. जर पावसामुळे सामना अनिर्णित राहिला, तर WTC 2025-27 मध्ये भारताच्या अंतिम फेरीच्या शर्यतीला मोठा धक्का बसू शकतो.

Continues below advertisement

पहिल्या दिवशी भारताचा दबदबा (IND vs SL 1st Test Update)

गॉलमध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला भारताला काही धक्के बसले असले तरी देवदत्त पडिक्कल आणि केएल राहुल यांनी डाव सावरला. पडिक्कलने संयमी आणि आक्रमक फलंदाजीचा सुरेख मेळ साधत शानदार शतक झळकावले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा तो नाबाद होता. दुसरीकडे केएल राहुलनेही 77 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, क्रॅम्प्सचा त्रास वाढल्याने त्याला मैदान सोडावे लागले आणि तो रिटायर्ड हर्ट झाला. भारताच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली असतानाच पावसाने दोन वेळा सामन्यात खोडा घातला. त्यामुळे पहिल्या दिवशी केवळ 73 षटकांचाच खेळ होऊ शकला.

Continues below advertisement

दुसऱ्या दिवशीही पावसाचा खेळ

दुसऱ्या दिवसाचा खेळ सकाळी 9.45 वाजता सुरू होणे अपेक्षित होते. दिवसाला 98 षटकांचा खेळ पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, गॉलमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे 12.20 वाजेपर्यंत पाऊस सुरू असल्याने मैदानावर वेळेत खेळ सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे भारताला आपली मजबूत स्थिती आणखी भक्कम करण्याची संधी मिळण्याआधीच हवामानाने सामना रोखला.

विशेष म्हणजे, पुढील सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीनही दिवसांसाठी गॉलमध्ये पावसाची शक्यता 50 टक्क्यांहून अधिक असल्याचे हवामान अंदाजातून दिसत आहे. त्यामुळे सामन्याचा बराचसा खेळ पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे.

सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठा फटका (If IND vs SL 1st Test Draw WTC Final Qualification)

भारत सध्या या सामन्यात मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत अनिर्णित राहू नये, अशीच अपेक्षा असेल. कारण या कसोटीतील एकही निकाल न लागल्यास WTC गुणतालिकेतील भारताच्या स्थितीवर त्याचा थेट परिणाम होईल. भारत आणि श्रीलंकेमधील गॉल कसोटी ड्रॉ झाली, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण मिळतील. त्यानंतर भारताची पॉइंट्स पर्सेंटेज अर्थात विजयाची टक्केवारी सुमारे 51.85 टक्क्यांवर येईल.

सध्या भारताने WTC 2025-27 चक्रात 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने 4 सामने जिंकले, 4 गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताच्या खात्यात 52 गुण असून पॉइंट्स पर्सेंटेजच्या आधारावर टीम इंडिया पाचव्या स्थानावर आहे.

फायनलचा मार्ग होणार आणखी कठीण

गॉल कसोटी ड्रॉ झाल्यास भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडचणी वाढतील. कारण या सामन्यानंतर भारताचे या चक्रात आणखी 8 कसोटी सामने शिल्लक राहतील. यातील दोन सामन्यांतही भारताला पराभव पत्करावा लागला, तर अंतिम फेरीत पोहोचण्याचे गणित अत्यंत कठीण होऊ शकते. विशेष म्हणजे, भारताला या आठ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत गुण गमावणे भारतासाठी महागात पडू शकते. त्यामुळे गॉलमध्ये पावसामुळे एक सामना ड्रॉ होणे ही केवळ एका कसोटीची बाब राहणार नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण WTC मोहिमेवर होऊ शकतो.

हे ही वाचा -

ODI World Cup 2027 : क्रिकेट वर्ल्डकपसाठी ICCचा मास्टरप्लॅन; महात्मा गांधींना अशी देणार अनोखी श्रद्धांजली? जय शाह मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत