West Indies vs India, 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा सहज पराभव केला. भारतीय संघाने दिलेले आव्हान वेस्ट इंडिजने चार विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या आक्रमणापुढे 181 धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजने हे आव्हान सहा विकेट राखून सहज पार केले. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याने कर्णधारपदाला साजेशी 63 धावांची खेळी केली. या विजयासह वेस्ट इंडिजने तीन सामन्याच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. 


भारतीय संघाने दिलेल्या 182 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजने 36.4 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात पार केले. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने दमदार सुरुवात केली. ब्रँडन किंग आणि कायल मायर्स यांनी संयमी आणि दमदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागिदारी केली. ब्रँडन किंग याला शार्दूल ठाकूर याने 15 धावांवर बाद केले. या खेळीत ब्रँडन किंग याने तीन चौकार लगावले. एथनाजे याला मोठी खेळी करता आली नाही, तो फक्त सहा धावांवर बाद झाला. कायल मायर्स याने चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 36 धावांचे योगदान दिे. शिमरोन हेटमायर याला 9 धावांवर बाद झाला.... काएसी कॅर्टी याने नाबाद 48 धावांची खेळी केली. तर कर्णधार शाय होप याने नाबाद 63 धावांचे दमदार खेळी केली. शाय होप याने 80 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या. कॅर्टी याने चार चौकाराच्या मदतीने 48 धावांचे योगदान दिले. शाय होप आणि कॅर्टी यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 91 धावांची भागिदारी केली. 


भारताकडून शार्दूल ठाकूर सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला. शार्दूल ठाकूर याने तीन फलंदाजांना तंबूत धाडले. कुलदीप यादव याने एक विकेट घेतली. हार्दिक पांड्या, मुकेश कुमार, उमरान मलिक, रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांना एकही विकेट मिळाली नाही.




हार्दिक, संजू अन् सूर्याही फ्लॉप, भारताचा डाव 181 धावांवर गारद


वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यापुढे भारताचा डाव 181 धावांवर आटोपला. भारतीय फलंदाजांना संपूर्ण 50 षटकेही फलंदाजी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर भारताची फलंदाजी ढेपाळली. भारतीय संघाने 40.5 षटकात 181 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून ईशान किशन याने 55 धावांची खेळी केली. त्याशिवाय शुभमन गिल याने 34 धावांचे योगदान दिले. या दोघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. वेस्ट इंडिजकडून मोटी आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या.  शेफर्डने 8 षटकात 37 धावा दिल्या. मोटीने 9.5 षटकात 36 धावा दिल्या. जोसेफने २ बळी घेतले. यानिक आणि सील्सला प्रत्येकी एक विकेट मिळाली. 


दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी विराट कोहली यांना आराम देण्यात आला होता. संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात दमदार केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 90 धावांची भागिदारी केली. पण त्यानंतर भारतीय संघाचा डाव ढेपाळला. प्रत्येक फलंदाजांनी ये रे माझ्या मागल्या प्रमाणे विकेट फेकल्या. एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. 


सूर्यकुमार यादव याने 24 धावांची खेळी करत संघर्ष केला, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुार यादव याने 25 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. ईशान किशन, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांच्याशिवाय एकाही फलंदालाजाला मोठी खेळी करता आली नाही.  विराट कोहलीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या संजू सॅमसन याने निराश केले. संजू सॅमसन अवघ्या 9 धावा काढून तंबूत परतला. अक्षर पटेल याने एक धाव काढून बाद झाला. कर्णधार हार्दिक पांड्या याला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. हार्दिक पांड्या सात धावांवर बाद झाला. रविंद्र जाडेजा यानेही निराशाजनक कामगिरी केली. जाडेजा 10 धावांवर बाद झाला. शार्दूल ठाकूर याने 16 धावांचे योगदान दिले. कुलदीप यादव याने नाबाद आठ धावांची खेली केली. उमारन मलिक याला खातेही उघडता आले नाही. मुकेश कुमार याने सहा धावांचे योगदान दिले.