Ashish Nehra Hardik Pandya: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका 27 जुलैपासून सुरू होणार आहे. यासाठी टीम इंडिया 22 जुलै रोजी श्रीलंकेला रवाना झाली आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची (Gautam Gambhir) ही पहिली मालिका असणार आहे. टी-20 फॉरमॅटसाठी टीम इंडियाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव कशा पद्धतीने कर्णधारपद हाताळतो, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

  


टी-20 फॉरमॅटसाठी कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्याच्या नावाची चर्चा असताना सूर्यकुमार यादवचं नाव घोषित करण्यात आलं. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले. हार्दिक पांड्याला कर्णधार करायलं हवं होतं, असं मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केलं. आता भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी यावर भाष्य केलं आहे. 


मला आश्चर्य वाटले नाही-


आशिष नेहरच्या मते मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या डोक्यात काही कल्पना असतील आणि आपण या निर्णयाचा आदर करायला हवा. हार्दिक पांड्या कर्णधार किंवा उपकर्णधार म्हणून फिट बसत नसेल. त्यामुळे हार्दिक पांड्याला कर्णधार न बनवल्याने मला आश्चर्य वाटले नाही. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. प्रत्येक प्रशिक्षक आणि प्रत्येक कर्णधाराचे विचार वेगवेगळे असतात, असं आशिष नेहरा म्हणाला. 


सूर्यकुमार यादवला कर्णधार का केले?; अजित आगरकरांनी सांगितलं कारण!


सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले कारण तो पात्र खेळाडूंपैकी एक आहे. सूर्यकुमार यादव सर्वोत्तम टी-20 मधील फलंदाजांपैकी एक आहे. आम्हाला असा कर्णधार हवा आहे, जो सर्व सामने खेळू शकेल. हार्दिक पांड्याचा फिटनेस त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे. हार्दिक हा एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. परंतु फिटनेस हे एक आव्हान आहे. त्यामुळे नेहमी उपलब्ध असेल, असा एक खेळाडू हवा आहे. यासाठी सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आल्याची माहिती अजित आगरकर यांनी दिली. 


श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ-


सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या , शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.


भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक-


27 जुलै - 1ली टी-20 (पल्लेकेले)


28 जुलै - दुसरी टी-20 (पल्लेकेले)


30 जुलै - तिसरी टी-20 (पल्लेकेले)


2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)


4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)


7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)


संबंधित बातमी:


घटस्फोटानंतरही स्वत:ला रोखू शकला नाही; नताशाची पोस्ट अन् हार्दिक पांड्याची कमेंट, काय म्हणाला?