Sai Sudharsan Ind Vs Wi 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीतही वरचढ दिसत आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वालने शानदार शतक ठोकले, पण आणखी एक खेळाडू होता ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तो म्हणजे साई सुदर्शन. या सामन्यातील खेळीमुळे साई सुदर्शनने आपल्या करिअरला अक्षरशः नवसंजीवनी दिली आहे. आतापर्यंत त्याला कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याला सारख्या संधी दिल्या, मात्र तो त्या संधींचा फायदा घेऊ शकला नव्हता. पण यावेळी त्याने अप्रतिम फलंदाजी करत सर्वांना सडेतोड उत्तर दिलं.
याआधी इंग्लंडमध्ये साई सुदर्शन सतत अपयशी ठरत होता. मग अहमदाबादमधील अपयशानंतर टीम इंडिया जेव्हा दिल्लीच्या मैदानावर उतरली, तेव्हा सुरुवात मंद गतीने झाली, पण मग यशस्वी जैस्वालसोबत साई सुदर्शननं अप्रतिम भागीदारी केली. दोघांनी मिळून 193 धावांची भागीदारी करत भारताची मजबूत पायाभरणी केली आणि साईला हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून दिला.
साईच्या करिअरला मिळाली ‘नवसंजीवनी’
साई सुदर्शननं 165 चेंडूत 87 धावा केल्या आणि 12 चौकार मारले. शतक थोडक्यात हुकलं, पण आत्मविश्वासानं भरलेली ही खेळी त्याच्या करिअरसाठी सोन्याची संधी ठरली आणि टीकाकारांना दिलेला ठोस उत्तरही होती. यापूर्वी वेस्टइंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मिळालेल्या संधीचा साई फायदा घेऊ शकला नव्हता. अहमदाबादच्या सोप्या खेळपट्ट्यांवरसुद्धा त्याचा बॅट शांतच राहिला. परिणामी अनेक माजी खेळाडूंनी त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले.
साई सुदर्शन वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर तुटून पडला
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावा केल्या. वॉरिकनने केएल राहुलला (38) बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर यशस्वी आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 306 चेंडूत 196 धावांची भागीदारी केली. 165 चेंडूत 87 धावा करून साई बाद झाला.
हे ही वाचा -