नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ ट्वेन्टी-20  विश्वचषकासह गुरुवारी मायदेशी पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट संपूर्ण संघानं घेतली होती. या भेटीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू यांच्या संवादाचा व्हिडीओ समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंसोबत संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) पहिल्या वर्ल्ड कपमधील सर्वात लहान खेळाडू ते आता संघाचा कॅप्टन कसं वाटतंय, असा प्रश्न विचारला. यावर रोहित शर्मानं त्याचे अनुभव सांगितले. 



रोहित शर्मा म्हणाला की,  2007 ला पहिल्यांदा संघात आलो होतो. आयरलँडचा दौरा राहुल द्रविड कॅप्टन असताना केला होता. तिथून आम्ही दक्षिण आफ्रिकेला गेलो, वर्ल्ड कप जिंकलो होतो, असं रोहित म्हणाला.  त्यावेळी सगळी मुंबई रस्त्यावर आली होती. विमानतळावरून वानखेडेपर्यंत जायला पाच तास लागले होते,असं रोहित शर्मानं सांगितलं. यानंतर वर्ल्ड कप आले गेले पण जिंकू शकलो नाही. लोकांमध्ये वर्ल्ड कप बाबत खूप अपेक्षा होती. न्यूयॉर्कमध्ये गेलो, सरावाला चांगली मैदानं नव्हती,पण सर्वांचं लक्ष बारबाडोसमध्ये फायनल खेळण्यावर होतं, असं देखील रोहित म्हणाला.


लोक रात्रभर रस्त्यावर भारताचा झेंडा घेऊन फिरतात ते पाहणं त्यावेळी बरं वाटतं. नव्या पिढीला प्रेरणा कशी देऊ असं वाटायचं. आमच्या पिढीच्या काळात राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी आम्हाला प्रेरणा दिली असं रोहितनं सांगितलं. आता या वर्ल्ड कपमधून विजयातून आम्ही युवा पिढीला प्रेरणा दिली असंही रोहित शर्मानं सांगितलं. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानंतर रोहित भाई तुम्ही इतका वेळ गंभीर असता का असा सवाल केला. अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमच्या प्रगतीचं योगदान भारताला आहे, असं अफगाणिस्तानचे लोक म्हणतात, असंही मोदी म्हणाले. 


नरेंद्र मोदींचे राहुल द्रविडला प्रश्न ?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल द्रविडसोबत देखील संवाद साधला. यावेळी मोदी भारतीय संघाच्या खेळाडूंना म्हणाले की? तुम्ही राहुलला 20 वर्ष लहान केलं आहे. यावर राहुल द्रविडनं म्हटलं की याचं श्रेय या मुलांना जातं, मी खेळाडू राहिलोय आणि कोच राहिलोय.  या स्पर्धेत मी एकही रन केली नाही. विकेट घेतली नाही आम्ही फक्त पाठिंबा देऊ शकतो. खेळाडू मेहनत करतात. रोहित , विराट यांच्यासह सर्व जण मेहनत करतात. या यशाचं श्रेय त्या सर्वांना जातं.


मला या सर्वांनी चांगला अनुभव दिला.  या संघात 11 खेळाडू खेळले. चार खेळाडू बाहेर बसले. मोहम्मद सिराज बाहेर बसला. त्यानं तीन मॅच खेळल्या. संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि यजुवेंद्र चहल यांना एकही मॅच खेळता आली नाही. पण त्यांनी निराशा दाखवली नाही.जे बाहेर बसतात त्या खेळाडूंचा दृष्टिकोण असतो तो महत्त्वाचा असतो, असं राहुल द्रविड म्हणाला.


क्रिकेटमध्ये सर्वांचं योगदान असतं, टीम स्पिरिट महत्त्वाचं असतं. 2028 मध्ये अमेरिकेत ऑलिम्पिक होईल, त्यात क्रिकेटला स्थान मिळालंय.  याबद्दल नरेंद्र मोदींनी राहुल द्रविडला म्हटलं. 


मोदीजी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी क्रिकेटर्सना मिळत नाही, असं राहुल द्रविड म्हणाला. आता ती येत्या काळात मिळेल. इतर स्पोर्टर्स मधील चांगले खेळाडू आहेत. ते देशासाठी योगदान देतात. मोठ्या स्पर्धेत क्रिकेट असणं आवश्यक आहे. 


विजयाचे आनंदाश्रू पाहतो त्यावेळी पराभवाचे अश्रू किती वेदनादायक असतात हे कळतं, असं मोदी म्हणाले. विजयानंतर आनंद व्यक्त करताना  समजतं की पराभवाचे क्षण किती कठीण असतात, असं मोदी म्हणाले. 



संबंधित बातम्या : 


Team India : टीम इंडियाचा वानखेडेवर सत्कार सोहळा, राष्ट्रगीत सुरु असताना पाऊस सुरु, विराट अन् रोहित आश्चर्यचकीत Video


Virat Kohli : टीम इंडियाचं वानखेडेवर जंगी सेलिब्रेशन, दिमाखदार सोहळ्यानंतर विराट कोहली अन् रवींद्र जडेजाचं मुंबई पोलिसांसाठी खास ट्विट