Ravichandran Ashwin नवी दिल्ली: तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) 2024 च्या डिंडीगुल ड्रॅगन्स आणि नेल्लई रॉयल किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान एक अतिशय मनोरंजक प्रकार पहायला मिळाला. फिरकीपटू एस. मोहन प्रसादने नॉन स्ट्राईकरवर उभा असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रविचंद्रन अश्विनला मंकडिंगची भीती दाखवली. यावेळी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


सदर प्रकार ड्रॅगन्सच्या डावाच्या पहिल्या षटकात घडली, जेव्हा रविचंद्रन अश्विन नॉन स्ट्राईकरवर होता. यावेळी अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीज सोडली होती. गोलंदाज प्रसादच्या हे लक्षात येताच त्याने अश्विनला मंकडिंग पद्धतीने बाद करण्याचा इशारा दिला. विशेष म्हणजे मंकडिंग पद्धतीने अश्विनने अनेक फलंदाजांना बाद केले आहे. आयपीएलमध्ये मंकडिंगवरुन इंग्लंडचा फलंदाज जॉस बटलर आणि अश्विनचा वाद देखील झाला होता. आता अश्विनसोबतच असा प्रकार घडल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 


पाहा मंकडिंगचा व्हिडीओ-






मंकडिंगवर अश्विन काय म्हणाला होता?


अश्विनने आयपीएलच्या मागच्या सत्रात किंग्स पंजाबविरुद्ध राजस्थान सामन्यादरम्यान जोस बटलरला ‘मंकडिंग’द्वारे बाद करताच खेळ भावनेवर प्रश्न उपस्थित झाला होता. गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधीच जर फलंदाज क्रीजमधून बाहेर येत असेल तर हे खेळ भावनेला धरून आहे का, असा प्रश्न अश्विनने आयपीएलदरम्यान केला होता. 1948 च्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात महान अष्टपैलू विनू मंकड यांना बिल ब्राऊन याने धावबाद केल्यामुळे अशा प्रकारच्या बाद होण्यास ‘मंकडिंग’ असे नाव पडले. हा शब्द नकारात्मकरीत्या वापरला जात असला तरी फलंदाजाला बाद करण्यात कुठलीही चूक नाही, असं विधान अश्विनने केलं होतं.


श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा विजय-


भारत आणि श्रीलंका (India vs Sri lanka) यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावत 161 धावा केल्या होत्या. टीम इंडिया लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरताच पावसाला सुरुवात झाली. यानंतर डकवर्थ लुईस नियमानूसार 8 षटकांत 78 धावा करण्याचे लक्ष्य भारताला देण्यात आले होते. या प्रत्युत्तरात भारताची सुरुवात अतिशय खराब झाली.सलामीवीर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. मात्र यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी केली. यानंतर मथिशा पाथिरानाने सूर्यकुमारला झेलबाद केले. सूर्यकुमारने 12 चेंडूत 26 धावा केल्या. संघाच्या 65 धावा असताना टीम इंडियाला तिसरा धक्का बसला. यशस्वी जैस्वाल 15 चेंडूत 30 धावा करत बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने 9 चेंडूत 22 धावा केल्या. भारताने 6.3 षटकात लक्ष्य गाठत विजय मिळवला. भारताने या विजयासह टी-20 मालिका देखील जिंकली आहे.


संबंधित बातमी:


श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा विजय, मालिकाही जिंकली; सूर्यकुमार यादव, गौतम गंभीरचा जल्लोष