मुंबई : भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांमधले संबंध गेल्या कित्येक वर्षांपासून ताणलेले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीयांच्या मनातला त्वेष उफाळून आला. पाकिस्तानच्या कुरापतींमुळे जेव्हा जेव्हा पाकवर कुरघोडी करण्याची संधी मिळते, तेव्हा भारतीय चाहते सुखावतात. मग ते सर्जिकल स्ट्राईक असो, वा विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना. कालची मॅच पाहण्यासाठी आलेलं दाम्पत्य अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होतं. नवरा पाकिस्तानी आणि बायको भारतीय. मग चिअर कोणाला करायचं? यासाठी त्यांनी सुवर्णमध्य साधला.


पाकिस्तानी पतीदेव आणि भारतीय पत्नीसमोर प्रश्न होता, या सामन्यात कोणाला पाठिंबा द्यायचा. भारताला समर्थन दिलं, तर नवरा दुखावेल, मात्र पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मन हुंकार देत नव्हतं, अशी पत्नीच्या मनातली द्विधा. तर भारताला पाठिंबा देणं पाकिस्तानी नवऱ्याला मनापासून पटत नव्हतं, मात्र पाकिस्तानच्या नावाचा जयघोष करताना पत्नीला काय वाटेल, हाही प्रश्न मनात होताच. शेवटी दोन्ही संघांना पाठिंबा देण्याचा निर्णय उभयतांनी घेतला. दोन्ही संघांना पाठिंबा दर्शवणारी वैशिष्ट्यपूर्ण जर्सी घालून दोघं इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफॉर्ड स्टेडियमबाहेर आले.

जर्सीच्या अर्ध्या भागात होता भारताचा तिरंगा, तर दुसऱ्या भागात पाकिस्तानचा हिरवा रंग. आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना पाठिंबा देतच आहोत, पण आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, असे उद्गार पतीदेवांनी काढले. खेळीमेळीच्या वातावरणातील क्रिकेटला आमचं समर्थन आहे. जो संघ चांगला खेळेल, तो विजयी झाला पाहिजे. क्रिकेटचा विजय झाला पाहिजे, असं तो म्हणाला.

भारताने पाकिस्तानसमोर 337 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेले पाकिस्तानी फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणासमोर हतबल दिसले. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव झाला.

पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान 35 व्या ओव्हरमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. त्यानंतर सामना सुरु झाला त्यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानसमोर 40 षटकांत 302 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. म्हणजे अवघ्या 5 षटकांत पाकिस्तानला 136 धावांचं अशक्य आव्हान मिळालं होतं.