Asian Legends League 2026 Points Table : भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात करत आशियाई क्रिकेटमधील वर्चस्व कायम ठेवले आहे. रविवारी रात्री झालेल्या एशियन लिजेंड्स लीग 2026 स्पर्धेतील आठव्या सामन्यात इंडियन रॉयल्स संघाने पाकिस्तान पँथर्सचा थरारक लढतीत 2 विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे भारताने केवळ सलग दुसरा विजय नोंदवला नाही, तर गुणतालिकेतही अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाला या पराभवामुळे मोठा फटका बसला असून तो स्पर्धेत अजूनही विजयाविना तळाला आहे.

Continues below advertisement

पाकिस्तानने उभारले 167 धावांचे आव्हान

Continues below advertisement

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान पँथर्सने 20 षटकांत 6 बाद 167 धावा केल्या. कर्णधार इमरान नझीर याने 29 चेंडूत 47 धावांची आक्रमक खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याला इबरार अट्टा आणि तौफीक उमर यांनी प्रत्येकी 39 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. या तिघांच्या योगदानामुळे पाकिस्तानला स्पर्धात्मक धावसंख्या उभारता आली.

ऋषी धवनची अर्धशतकी खेळी, भारताचा थरारक विजय

168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंडियन रॉयल्सला सुरुवातीलाच कर्णधार नमन ओझा अवघ्या 4 धावांवर बाद झाल्याने धक्का बसला. मात्र अभिषेक जलोटा (30 धावा, 19 चेंडू) आणि सरुल कंवर (46 धावा, 29 चेंडू) यांनी डाव सावरला. कंवरने 3 चौकार आणि 4 षटकारांसह आक्रमक फलंदाजी केली. सामन्याचा खरा हिरो ठरला ऋषी धवन. त्याने 33 चेंडूत 50 धावांची जबाबदारीची खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

अखेरीस अनुरीत सिंग याने अवघ्या 6 चेंडूत नाबाद 16 धावा करत भारताचा विजय निश्चित केला. इंडियन रॉयल्सने 17.4 षटकांत 8 विकेट्स गमावत लक्ष्य गाठले आणि पाकिस्तानवर 2 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. पाकिस्तानकडून मोहम्मद इरफान, राहत अली आणि यासिर शाह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

गुणतालिकेत भारत अव्वल, पाकिस्तान तळाशी

या विजयामुळे इंडियन रॉयल्सने एशियन लिजेंड्स लीग 2026 च्या गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवत 100 टक्के यश कायम ठेवले आहे. दुसरीकडे पाकिस्तान पँथर्सची अवस्था बिकट झाली आहे. दोन सामन्यांनंतरही त्यांचे विजयाचे खाते उघडलेले नाही आणि सहा संघांच्या स्पर्धेत ते सहाव्या म्हणजेच अखेरच्या स्थानावर आहेत.

भारताचा पुढील सामना कधी?

इंडियन रॉयल्सने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात 31 जुलै रोजी बांग्लादेश टायगर्सचा 19 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर आता पाकिस्तानवरही मात करत संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भारतीय संघाचा पुढील सामना श्रीलंकन लायन्सविरुद्ध 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. सलग तिसरा विजय मिळवत अव्वल स्थान अधिक मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

हे ही वाचा -

Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO