England vs India 3rd Test Update : लॉर्ड्स टेस्टमध्ये भारताचा 22 धावांनी पराभव झाला. इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत मुसंडी मारली. रवींद्र जडेजा शेवटपर्यंत एकाकी लढत राहिला. के. एल. राहुल, वॉशिंगटन सुंदर, नीतीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यासोबत भागीदारी करत भारताचा डाव 71 वरून 170 पर्यंत नेला. मात्र, विजय मिळवता आला नाही. भारताच्या या पराभवामागे कोणते पाच मुख्य कारणं होती, पाहूया...

1. जैस्वालची निराशाजनक कामगिरी 

भारताचा आक्रमक सलामीवीर यशस्वी जैस्वाल या सामन्यात अपयशी ठरला. पहिल्या डावात 8 चेंडूंमध्ये 13 धावा केल्या. दुसऱ्या डावात तर तो खातेही न उघडता पुन्हा आर्चरकडून आऊट झाला. जैस्वालच्या लवकर बाद होण्यामुळे खालच्या फळीवर दडपण आलं.

2. करुण नायरचा नंबर 3 वर संघर्ष

नंबर तीनच्या जागेवर करुण नायर अजूनही स्थिरावलेला नाही. पहिल्या डावात 62 चेंडूंमध्ये 40 धावा करूनही तो मोठी खेळी करू शकला नाही. दुसऱ्या डावात केवळ 14 धावांवर बाद झाला. तीन कसोटीत त्याच्या नावावर एकही अर्धशतक नाही. ही भारतासाठी चिंतेची बाब ठरते.

3. वरच्या फळीतील अपयश

लॉर्ड्समधील पराभवाचे मुख्य कारण म्हणजे भारताच्या टॉप ऑर्डरने दिलेली दगाफटका. राहुल वगळता कोणताही फलंदाज ठसा उमटवू शकला नाही. जैस्वाल, करुणसह कर्णधार शुभमन गिलही फ्लॉप ठरला. गिलने पहिल्या डावात 16 आणि दुसऱ्या डावात केवळ 6 धावा केल्या. कृतीपेक्षा वाचाळ बडबडच जास्त होती, खेळापेक्षा वादावरच कर्णधार गिलचा भर जास्त दिसला.

4. चौथ्या दिवशीच लिहिला पराभवाचा अध्याय

जरी सामना पाचव्या दिवशी संपला असला, तरी भारताचा पराभव चौथ्याच दिवशी निश्चित झाला होता. भारताने दुसऱ्या डावात केवळ 58 धावांत 4 गडी गमावले आणि सामना इंग्लंडच्या ताब्यात गेला. वरच्या फळीचा कोसळलेला डाव, खालच्या फळीवर आलेला दडपण आणि अपयशी बचाव या सर्व गोष्टी भारताला भारी पडल्या.

5. लंचपूर्वी गमावलेली विकेट्स, तीच चूक केली पुन्हा

तीनही कसोटीत भारताने लंचपूर्वी विकेट गमावण्याची एकच चूक वारंवार केली. यामुळे टीम इंडियाने स्वतःहूनच मोमेंटम इंग्लंडकडे ढकलला.

  • पहिल्या कसोटीत लंचपूर्वी के. एल. राहुल आणि साई सुदर्शन आऊट झाले.
  • एजबेस्टनमध्ये लंचपूर्वी करुण नायर, दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा आऊट.
  • लॉर्ड्समध्ये तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत, तर दुसऱ्या डावात नीतीश रेड्डी लंचच्या शेवटच्या चेंडूवर आऊट.