IND vs WI, 3rd T20: वेस्ट इंडीजविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन खेळण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं 17 धावांनी विजय मिळवलाय. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं वेस्ट इंडीजच्या संघासमोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरनं सर्वोत्तम खेळी केली. या दोघांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारतानं अखेरच्या 4 षटकात 86 धावा केल्या. 


भारताचा डाव
भारताकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर ऋतुराज गायकवाड स्वस्तात माघारी परतला. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर त्यानं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यरसोबत अर्धशतकी भागीदारी केली. परंतु, 25 धावांवर असताना श्रेयस अय्यरला हेडन वॉल्शनं बाद केलं आणि भागीदारी मोडली. त्यानंतर ईशान किशनंही लगेच आपली विकेट्स गमावली. चौथ्या क्रमांकावर कप्तान रोहित शर्मा फलंदाजीला आला. पण तोही अपयशी ठरला. रोहितला केवळ 7 धावा करता आल्या. भारतानं 93 धावांवर 4 विकेट्स गमावले. त्यानंतर मैदानात आलेल्या सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरनं तुफान फटकेबाजी करीत भारताचा स्कोर 184 वर पोहचवला. सुर्यकुमार यादवनं 31 चेंडूत 65 (1 चौकार, 7 षटकार) आणि व्यंकटेश अय्यरनं 19 चेंडूत नाबाद 35 (4 चौकार, 2 षटकार) धावांची खेळी केली. ज्यामुळं भारतानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून वेस्ट इंडीजसमोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं. वेस्ट इंडीजकडून जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, फॅबियन ऍलन आणि हेडन वॉल्श यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


वेस्ट इंडीजचा डाव
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजच्या संघाची खराब सुरुवात झाली. वेस्ट इंडीजच्या संघानं तिसऱ्या षटकात दोन विकेट्स गमावल्या. दीपक चहरनं दोन्ही सलामीवीर काईल मेयर्स (6 धावा) आणि शाई होपला (8 धावा) तंबूत पाठवलं.  त्यानंतर निकोलस पूरन आणि रोवमन पॉवेल यांनी अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान, सातव्या षटकात मोठा फटका मारण्याचा नादात पॉवेलनं त्याची विकेट्स गमावली.  हर्षल पटेलनं त्याला झेलबाद केलं. त्यानंतर मैदानात आलेल्या कायरन पोलार्ड (5 धावा) आणि जेसन होल्डरही (2 धावा) स्वस्तात माघारी परतले.  100 धावांत वेस्ट इंडीजच्या संघाचे 6 गडी बाद झाले. त्यानंतर पूरननं रोमारियो शेफर्डसोबत किल्ला लढवला. पूरननं आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक पूर्ण केले, पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. 20 षटकात वेस्ट इंडीजच्या संघाला 9 विकेट्स गमावून 167 धावापर्यंत मजल मारता आली. भारताकडून हर्षल पटेलनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर आणि व्यंकटेश अय्यर यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha