India vs West Indies Virat Kohli : वेस्ट इंडिजविरोधातील तीन सामन्याची एकदिवसीय मालिका भारताने 3-0 च्या फराकाने जिंकली आहे. या मालिकेत माजी कर्णधार विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्याप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही विराट कोहली स्वस्तात माघारी परतला. 


अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीला धावांचे खातेही उघडता आले नाही.  विराट कोहली शून्य धावसंख्येवर बाद झाला. विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद जाली आहे.  आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा शून्य धावसंख्यावर (फलंदाजी एक ते सात यादरम्यान) बाद होणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत विराट कोहली 32 वेळा शून्य धावसंख्येवर बाद झालाय. विराट कोहलीने माजी फलंदाज विरेंद्र सेहवागचा विक्रम मोडीत काढला आहे. सेहवाग आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 31 वेळा शून्य धावसंख्यावर बाद झालाय.  


विराट कोहलीने लाजीरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर विराट कोहलीवर टीकाही होत आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा शून्य धावसंख्यावर होणारा फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. तिसऱ्य एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. विराट कोहलीला अल्जारी जोसेफने (Alzarri Joseph) बाद केलं.  विराट कोहलीने दोन चेंडूचा सामना केला, पण एकही धाव काढता आली नाही.  
 
विराट कोहलीचं खराब प्रदर्शन – 
माजी कर्णधार विराट कोहलीला वेस्ट विंडिजविरोधात आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. तीन सामन्यात विराट कोहलीला फक्त 26 धावाच करता आल्या. म्हणजे तीन सामन्यात विराट कोहलीने 8.67 सरासरीने धावा काढता आल्या. विराट कोहलीची एकदिवसीय सामन्यातील सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. 


वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप -
अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट विंडिजचा 96 धावांनी पराभव केला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला आहे.  रोहित शर्मा पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच मालिका विजय आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट विडिंजला विजयासाठी 266 धावांचे आव्हान दिले होते. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे वेस्ट विंडिजचा संघ 37.1 षटकांत 169 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 265 धावा केल्या होत्या.