Indian's ODI record At Wankhede Stadium: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) भारतीय संघाचा विश्वचषकात चौखूर उधळलेला अश्वमेध मुंबईत येऊन दाखल झाला आहे. भारतीय संघाचा हा अश्वमेध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) रोखण्याचा प्रयत्न उद्या कुशल मेंडिसचा श्रीलंका संघ करणार आहे.  पण या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी (Team India) चिंतेत टाकणारी आकडेवारी समोर आली आहे.  वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा रेकॉर्ड खराब आहे.  


मायदेशातील इतर मैदानाच्या तुलनेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाने सर्वाधिक सामने गमावले आहेत. अशा स्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची विजयी मालिकाही खंडित होऊ शकते. टीम इंडियाने वानखेडेवर आतापर्यंत 20 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी मेन इन ब्लू संघाला 9 पराभवांना सामना करावा लागलाय. कोलकाताचे ईडन गार्डन या मैदानावर टीम इंडियाने आठ सामने गमावले आहेत. भारतीय संघाला पुढील सामना आफ्रिकेविरोधात ईडन गार्डन मैदानावर खेळायचा आहे.  भारतीय संघाने ईडन गार्डनवर 22 पैकी 8 एकदिवसीय सामने गमावले आहेत.


अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने 19 पैकी 8 एकदिवसीय सामने गमावले आहेत. दिल्लीचे अरुण जेटली मैदानात भारताने 22 पैकी 7 एकदिवसीय सामने गमावले आहेत.  जमशेदपूरच्या कीनन स्टेडियमवर 9 पैकी 7 एकदिवसीय सामने गमावलेत.  चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 15 पैकी 6, मोहालीच्या PCA IS बिंद्रा स्टेडियमवर 17 पैकी 6 आणि विदर्भ सीए ग्राउंडवर 12 पैकी 6 एकदिवसीय सामने गमावले आहेत.  


मायदेशात कोणत्या मैदानात वनडेत भारताचा सर्वाधिक पराभव झाला -


9 सामने गमावले - वानखेड़े स्टेडियम, मुंबई (20 सामने)
8 सामने गमावले - ईडन गार्डन, कोलकाता (22सामने)
8 सामने गमावले - नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (19सामने)
7 सामने गमावले - अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली (22सामने)
7 सामने गमावले - कीनन स्टेडियम, जमशेदपुर (9सामने)
6 सामने गमावले - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (15सामने)
6 सामने गमावले - पीसीए आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली (17सामने)
6 सामने गमावले - विदर्भ सीए ग्राउंड, नागपूर (12सामने). 
 
आज श्रीलंकेविरोधात सामना - 
विश्वचषकाच्या रणांगणात रोहित शर्माच्या भारतीय संघाचा सामना आज श्रीलंकेशी होतोय. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारतानं विश्वचषकाच्या मोहिमेत आतापर्यंत सहापैकी सहाही सामने जिंकले आहेत. त्यामुळं विश्वचषकाच्या गुणतालिकेत सर्वाधिक 12 गुणांसह भारत अव्वल स्थानी आहे. पण सातव्या स्थानावरच्या श्रीलंकेला सहापैकी केवळ दोनच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. त्यामुळं विश्वचषकातलं आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेला बलाढ्य भारतीय संघावर विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यासाठी श्रीलंकेची भिस्त हील प्रामुख्यानं सदीरा समराविक्रमा, पाथुम निसांका आणि कुशल मेंडिस या तीन फलंदाजांवर राहिल. त्या तिघांनीही विश्वचषकात धावांचा रतीब घातला आहे. तसंच दिलशान मधुशंका आणि कासून रजिथा या वेगवान गोलंदाजांचं आक्रमण यशस्वी ठरताना दिसत आहे