Indian Team Lost 6 Wickets In Just 11 Balls : भारत-दक्षिण आफ्रिका (Ind Vs SA Test Match) यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा पहिला दिवस क्रिकेटच्या इतिहासात कायमचा संस्मरणीय ठरला.  2024 मधील पहिल्या कसोटीत भारतीय क्रिकेटपटूंची कामगिरी धक्का देणारी म्हणावी लागेल. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 55 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर फलंदाजांना मोठी आघाडी घेता आली नाही. आफ्रिकन गोलंदाजांनी टीम इंडियाचा डाव 153 धावात गुंडाळला. टीम इंडियाचे शेवटचे सहा फलंदाज अवघ्या 11 चेंडूत माघारी परतले. धक्कादायक म्हणजे या सहाही फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. 


कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या एकूण 23 विकेट पडल्या. म्हणजे दोन्ही संघाचा पहिला डाव आटोपला. 
नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 55 धावांत गुंडाळले आणि नंतर 153 धावांवर बाद झाले, त्यामुळे 98 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने तीन गडी गमावून 62 धावा केल्या होत्या आणि भारताची आघाडी 36 धावांवर कमी झाली होती.


11 चेंडूत सहा फलंदाज माघारी, भोपळा पण फोडला नाही


चहापानापर्यंत भारताच्या चार विकेट्सवर 111 धावा झाल्या होत्या. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात मोठी आघाडी घेईल असा अंदाज होता. पण चहापानानंतर 153 धावांवर संपूर्ण टीम तंबूत परतली. भारताने शेवटच्या सहा विकेट 11 चेंडूत गमावल्या. 34व्या षटकात मेडेनसह लुंगी एनगिडीने प्रत्येकी तीन बळी घेतले. पहिल्या चेंडूवर केएल राहुल (8), तिसऱ्या चेंडूवर रवींद्र जाडेजा (0) आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराह (0) बाद झाला. 


भारतासाठी फक्त तीन फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला, ज्यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक 46 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.


सहा फलंदाजांना खातेही उघडता आले नाही


भारतीय डावाची सुरुवात चांगली झाली होती. ठाराविक अंतराने विकेट पडत होत्या, पण धावांचा वेग समाधानकारक होता. मात्र चहापानाच्या सत्रानंतर आफ्रिकन गोलंदाजांनी भेदक मारा करत टीम इंडियाच्या फलंदाजांचे अवघ्या 11 चेंडूत तीन तेरा वाजवले.






स्कोअर बोर्डवर 153 धावा असताना भारताने आपला पाचवा गडी गमावला आणि त्यानंतर संपूर्ण संघ या धावसंख्येवर ऑलआऊट झाला. म्हणजेच एकही धाव न काढता संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. शेवटच्या सहा फलंदाजांना धावफलकावर एकही धाव जोडता आली नाही. कसोटी इतिहासातील एकूण आठवा आणि भारतीय संघासाठी दुसऱ्यांदा सहा फलंदाजांना भोपळाही फोडण्यास अपयश आले.  या सामन्यापूर्वी 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचे सहा फलंदाज शून्य धावांवर बाद झाले होते.