IND Vs NZ WTC 2021 Final: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये शुक्रवारपासून साऊथम्प्टनमधील एजेस बोल या स्टेडियममध्ये जागतिक कसोटी क्रिकेट अर्थात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने दोन फिरकीपटूंना प्लेइंग इलेव्हनमध्य स्थान दिले आहे. वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीत दोन फिरकीपटूंसोबत खेळण्याच्या भारताच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताच्या माजी डावखुरा फिरकीपटू दिलीप दोशी यांनी मात्र दोन फिरकीपटू खेळवण्याच्या निर्णयाला सर्मथन दिलं आहे.


दिलीप दोशी यांच्या मते, चॅम्पियनशिपच्या या अंतिम सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांची भूमिका फार मोठी असणार आहे. दिलीप दोशी हे भारताचे असे खेळाडू आहे की, त्यांनी इतर भारतीयांपेक्षा इंग्लंडमध्ये जास्त क्रिकेट खेळले आहेत. दोशी यांनी सांगितले की, ‘भारताला प्रत्येक रनसाठी संघर्ष करावा लागणार आहे. या सामन्यात जडेजा आणि अश्विनची मोठी भूमिका असेल असे मला वाटते.’


दिलीप दोशी यांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे. "या कठीण वातावरणातही रोहित शर्मा, कोहली आणि रहाणे यांनी चांगली कामगिरी केली तर शुभमन गिलनेही ठसा उमटविला", असं दोशी म्हणाले.


न्यूझीलँडच्या तिसऱ्या दिवसअखेर 2 विकेट्सवर 101 धावा, कॉन्वेचं अर्धशतक


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये सुरु आहे.  पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पाण्यात गेल्यानंतर भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात आला. यानंतर न्यूझीलँडनं सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेच्या अर्धशतकाच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 101 धावा केल्या आहेत. न्यूझीलँडकडून टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी सावध सुरुवात करुन दिली.  टॉम लॅथमला अश्विनने 30 धावांवर बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं.  लॅथम आणि कॉन्वेने पहिल्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विल्यमसनच्या साथीनं डेव्हन कॉन्वेने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दिवसाच्या शेवटच्या षटकात इशांत शर्माने कॉन्वेला 54 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला.  तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी न्यूझीलँडने 2 बाद 101 धावा केल्या आहेत. न्यूझीलँड अद्याप 116 धावांची पिछाडीवर आहेत. सध्या विल्यमसन 12 तर  रॉस टेलर शून्यावर खेळत आहेत.


जेमिसन वादळ ; भारताचा पहिला डाव गडगडला 


भारतीय संघानं 3 बाद 146 वरुन पुढे खेळायला सुरुवात केली. यात आज केवळ 71 धावांची भर टीम इंडियानं घातली. विराट कालच्याच 44 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला ऋषभ पंत केवळ धावा काढून  माघारी परतला. विराटनंतर अजिंक्य रहाणेचेही अर्धशतक हुकले. तो 49 धावांवर बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाला दोनशेपार पोहोचवले. चांगली सुरुवात करणारा अश्विन 22 धावांवर बाद झाला. उपाहारानंतर जेमिसनने  इशांत शर्माला (4) त्यानंतर जसप्रीत बुमराहला (0) लागोपाठ बाद केलं. शेवटी  ट्रेंट बोल्टने रवींद्र जाडेजाला (15) धावांवर बाद करत भारताचा डाव 217 धावांवर संपुष्टात आणला. न्यूझीलँडचा वेगवान गोलंदाज कायले जेमीसनने पाच विकेट घेतल्या. तर बोल्ट आणि वॅगनरनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. 


वाचा :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीचा अनोखा रेकॉर्ड, धोनीलाही टाकलं मागे