IND vs NZ Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण टीम इंडियाने त्यांचे सर्व सामने फक्त दुबईमध्ये खेळले. अंतिम सामन्यासाठी दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली, त्यापैकी एक लाहोर स्टेडियम आणि दुसरे दुबई स्टेडियम होते. पण सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचताच, आता स्पर्धेचा अंतिम सामना फक्त दुबईमध्येच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.




सामना किती वाजता होणार सुरू? 


आता अंतिम सामन्याबाबत चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की, दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याची वेळ बदलली आहे का? पण, असे काहीही नाही आणि सामना नियोजित वेळेवर खेळवला जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता खेळला जाईल. तर नाणेफेक 2 वाजता होईल. आतापर्यंत स्पर्धेतील सर्व सामने याच वेळी खेळले गेले आहेत.


आयसीसीच्या नॉकआउट सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा वरचष्मा


आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने नेहमीच टीम इंडियावर वर्चस्व गाजवले आहे. दोन्ही संघ बाद फेरीत चार वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी किवी संघाने 3 वेळा विजय मिळवला आहे, तर टीम इंडियाला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.


2000 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला, त्यानंतर 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला. पण, २०२३ च्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत केले होते.


2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने या चारही सामन्यांमध्ये (तीन लीग सामने आणि एक उपांत्य फेरी) नेत्रदीपक विजय मिळवला आहे. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. याशिवाय, न्यूझीलंड संघाला साखळी सामन्यात टीम इंडियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.


एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत आणि न्यूझीलंड हेड-टू-हेड रेकॉर्ड


आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 119 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी टीम इंडियाने 61 सामने जिंकले आहेत आणि न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय, 7 सामने अनिर्णीत राहिले आणि एक सामना बरोबरीत सुटला.


अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.