India vs New Zealand 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात तिसरा टी20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु होत असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली असून टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत आज जो संघ जिंकेल, मालिका त्याच्या नावावर होईल. 


सामना होणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फलंदाज दमदार कामगिरी करताना दिसून आले आहेत. 6 सामन्यांच्या 12 डावांमध्ये 10 वेळा 150+ धावा केल्या आहेत. यामध्ये, 5 वेळा संघांनी 180+ चा स्कोअर ओलांडला आहे. येथे सर्वोच्च धावसंख्या 224 धावांची आहे. फलंदाजांसाठी फायद्याच्या या विकेटवर 1 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. अहमदाबादमध्ये आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले गेले आहेत आणि त्या सर्वांमध्ये भारतीय संघ मैदानात उतरला आहे. टीम इंडियाने येथे चार सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. भारतीय संघाचा विचार करता एका बदलासह टीम इंडिया मैदानात उतरत आहे. भारताने युजवेंद्र चहलला विश्रांती दिली असून उमरान मलिकाला संधी दिली आहे. 


कसे आहेत दोन्ही संघ?


भारत- शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग


न्यूझीलंड - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, ब्लेअर टिकनर









टीम इंडियाने दोन वर्षांपासून टी-20 मालिकेत अंजिक्य


भारतीय संघाने (Team India) मागील दोन वर्षांपासून एकही टी-20 मालिका गमावलेली नाही. टीम इंडियाचा शेवटचा पराभव श्रीलंकेकडून (IND vs SL) जुलै 2021 मध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर  झाला होता. श्रीलंकेने घरच्या मैदानावर ही तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी त्यांनी जिंकली होती.


हे देखील वाचा-