IND vs NZ, 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात टी20 मालिका आजपासून खेळवली जाणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिल्यावर आता टी20 मालिका सर करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. आज होणारा पहिला टी20 सामना रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (JSCA International Stadium) खेळवला जात आहे. दरम्यान आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 अशी आघाडी घेणार असल्याने आजचा सामना दोघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे सामन्यापूर्वी मैदानाची खेळपट्टी (Pitch Report) कशी आहे, अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ... 


आजची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल


रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे भारतातील इतर मैदानांपेक्षा थोडं वेगळं आहे. इतर मैदानांच्या तुलनेत हे एक मोठं मैदान आहे, तसंच इथे फिरकीपटूंना अधिक यश मिळतं असा या मैदानाचा इतिहास आहे. या खेळपट्टीवर अधिक स्पीन करु शकणारे संथ गोलंदाज अधिक प्रभावी ठरतील. यापूर्वी रांचीमध्ये तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. 2016 मध्ये येथे झालेल्या T20 सामन्यात 196 धावा झाल्या होत्या. त्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एकदा 118 आणि एकदा 196 धावा केल्या. रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक फायदेशीर नाही. याठिकाणी फिरकीपटूंना अधिक फायदा मिळत असल्याचं दिसून आलं आहे.पण खेळपट्टीची एकूण परिस्थिती पाहता फलंदाजांना अधिक फायदा होतो. विशेष म्हणजे या मैदानावर खेळल्या गेलेल्या 28 T20 सामन्यांमध्ये, फक्त एकदाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 200 च्या वर धावा करता आल्या आहेत. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 160 च्या मध्यभागी आहे. त्यात  भारतातील अलीकडच्या काळातील सामने पाहता आज संघांनी 200 च्या वर धावा केल्या तर आश्चर्य वाटणार नाही. दव हा देखील एक महत्त्वाचा घटक आज राहणार आहे. आणि पाठलाग करणाऱ्या संघांला अधिक फायदा मिळू शकणार असल्याने गोलंदाजी घेणं नाणेफेक जिंकणारा संघ पसंद करेल अशी शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक आज महत्त्वाची ठरु शकते...


कसं असेल रांचीचं वातावरण


भारत आणि न्यूझीलंड टी-20 सामन्याच्या दिवशी म्हणजेच, आज 27 जानेवारी रोजी रांचीचे हवामान क्रिकेटच्या एका उत्तम सामन्यासाठी अनुकूल असेल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. शुक्रवारी याठिकाणी दिवसाचं तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी त्यात घट होऊन तापमानाचा पारा 17 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. तसंच रांचीमध्ये दिवसभर आणि सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा पहिला T20 सामना कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होईल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.



न्यूझीलंडविरुद्ध भारताचा टी20 संघ







हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार 


महत्त्वाच्या इतर बातम्या :