India vs England: सध्या भारतीय संघ इग्लंड (IND vs ENG) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत इंग्लडशी रिशेड्युल केलेला एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय. भारताचा माजी क्रिकेटपूट राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतानं 2007 मध्ये इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकली होती. दरम्यान भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. तर, इग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ॲंडरसन उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. नुकतंच ॲंडरसननं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 650 विकेट्सचा टप्पा गाठलाय. इंग्लंडविरुद्ध पाचवा कसोटी सामन्यात विराट समोर कोणती पाच मोठी आव्हानं असतील? यावर एक नजर टाकुयात.


येत्या 1-5 जुलै दरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. या सामन्यात विराट कोहलीकडं मोठी जबाबदारी असणार आहे. कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरतो. अशा स्थितीत संघासाठी धावा करणं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. कोहलीचा अलीकडचा फॉर्म खराब ठरलाय, त्यामुळं त्याच्यावर दडपण असणं स्वाभाविक आहे.


गेल्या अनेक महिन्यांपासून विराटची शतकासाठी झुंज
विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक झळकावलं होतं. त्यानंतर कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर त्यानं 136 धावांची खेळी केली. तेव्हापासून विराट कोहलीनं 73 डावांमध्ये 37.54 च्या सरासरीनं 2478 धावा केल्या आहेत. ज्यात फक्त 24 अर्धशतकांचा समावेश आहे. 


जेम्स ॲंडरसन उत्कृष्ट फॉर्म
जेम्स ॲंडरसन सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. महत्वाचं म्हणजे, त्याच्या गोलंदाजीसमोर विराट कोहली नेहमी संघर्ष करताना दिसलाय. जेम्स ॲंडरसननं कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत विराट कोहलीला सात वेळा बाद केलं आहे. 2012 मध्ये कोहली एकदा अँडरसनच्या चेंडूवर बाद झाला होता. तर, 2014च्या दौऱ्यात 4 वेळा ॲंडरसन कोहलीला आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. दरम्यान, 2016 आणि 2018 च्या मालिकेत विराट कोहलीनं जेम्स ॲंडरसनच्या गोलंदाजीचा चांगला सामना केला. परंतु, त्यानंतर गेल्या वर्षी पुन्हा एकदा ॲंडरसननं दोन वेळा विराटला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.


विराटची कमजोरी
विराट कोहली गेल्या दोन-तीन वर्षात एकसाखराच फटका खेळताना बाद झाल्याचं पाहायला मिळालंय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू विराटसाठी धोकादायक ठरलाय. तर, कव्हर ड्राईव्ह खेळतानाही त्याला अनेक अचडणी आल्या आहेत. विराटनं मैदानात अनेक उत्कृष्ट फटके मारले आहेत. परंतु, त्याचा खराब फॉर्म त्याच्यासाठी धोकादायक ठरलाय.


भारतासाठी धावा करण्याचा दबाव
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतरची विराटची परदेशी भूमीवर खेळण्याची पहिली कसोटी आहे.विराट कोहलीवर कर्णधारपदाचे कोणतेही दडपण नसेल. पण एक फलंदाज म्हणून त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचं दडपण नक्कीच असेल. कारण गेल्या काही दिवसांपासून विराटचा फॉर्म चिंतेचा विषय ठरत आहे. 


आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी
आयपीएलमध्ये अनेक विक्रमाला गवसणी घालणाऱ्या विराट कोहलीसाठी आयपीएलचा पंधरावा हंगाम अतिशय खराब ठरलाय. या हंगामात त्यानं तीन वेळा गोल्डन डकचा शिकार ठरलाय. रॉयल चॅलेंजर्सकडून खेळताना त्यानं 16 सामन्यात 22.73 च्या सरासरीनं 341 धावा केल्या. ज्यात फक्त दोन अर्धशतकांचा समावेश आहे. 


हे देखील वाचा-