IND vs ENG, Day 4 Highlights : कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा पाहायला मिळत नाही अशी फटकेबाजी आज इंग्लंड संघाने दाखवली. भारतीय संघ आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील शेवटच्या डावात इंग्लंडने 378 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी केवळ तीन विकेट्स गमावत 259 धावा केल्या आहेत. यावेळी आधी अॅलेक्स आणि जॅक यांनी चांगली सुरुवात केली. नंतर त्या दोघांसह ऑलीही बाद झाला. पण मग जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी अत्यंत धमाकेदार खेळी केली. त्यामुळे आता अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची गरज असून त्यांच्या हातात सात विकेट्सही शिल्लक आहेत.



सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजी घेतली. ज्यानंतर भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली पण निम्मा संघ बाद झाला असताना ऋषभ पंतने 146 आणि रवींद्र जाडेजाने 104 धावा केल्यामुळे भारताने 416 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली, पण जॉनी बेअरस्टो (104) याचं शतक संघासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं. पण, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ 61.1 षटकांत 284 धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात भारताने 132 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर दुसरा डाव खेळायला आलेल्या भारताच्या फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. सर्वत फलंदाज स्वस्तात माघारी परतले. पण पुजारा आणि पंत यांची अर्धशतकं संघासाठी महत्त्वाच्या ठरली. यावेळी पंतने (Rishabh Pant) 86 चेंडूत 57 तर पुजाराने (Cheteshwar Pujara) 168 चेंडूत 66 धावा केल्यामुळेच भारत 245 धावा करु शकला. ज्यामुळे आता इंग्लंडसमोर 378 धावांचे एक तगडे लक्ष्य भारताने ठेवले.


त्याचा पाठलाग करताना इंग्लंडकडून सलामीवीर अॅलेक्स आणि जॅक यांनी दमदार सुरुवात केली. पण अॅलेक्स 56 तर जॅक 46 धावा करुन बाद झाला. नंतर ओली शून्य धावांवर बाद झाला. बुमराहने ऑली आणि जॅकला बाद केलं. तर अॅलेक्स धावचीत झाला. त्यानंतर मात्र जो रुट आणि जॉनी यांनी तुफान फटकेबाजी केली. जो रुटने 112 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 78 धावा लगावल्या असून जॉनीने 87 चेंडूत 8 चौकारांसह एक षटकार ठोकत नाबाद 72 धावा लगावल्या. ज्यामुळे इंग्लंडचा स्कोर 259 वर तीन बाद असून आता अखेरच्या दिवशी विजयासाठी त्यांना 119 धावांची गरज आहे.


हे देखील वाचा-