IND vs AUS,  WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मा याच्या चेहऱ्यावर पराभवाची खंत दिसत होती. सामन्यानंतर बोलताना रोहित शर्माने नेमकी चूक कुठे झाली ? अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर यांच्यासह गोलंदाजांचेही कौतुक केले. त्याशिवाय पुढील विजेतेपदासाठी प्रयत्न करु, असा विश्वासही चाहत्यांना दिला. सपोर्ट करणाऱ्या सर्व चाहत्यांचे रोहित शर्मा याने आभार मानले. 


जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता तीन सामन्याच्या मालिकेतून ठरवायला हवा. पुढील हंगामापासून तसा निर्णय घेण्यात यावा, असे रोहित शर्मा म्हणाला. द्विपक्षीय मालिकेपेक्षा आयसीसी कसोटी फायनल महत्वाचा आहे, पराभवामुळे आम्ही सर्वजण निराश आहोत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फक्त इंग्लंडमध्ये का होतेय ? जगातील कोणत्याही ठिकाणी घेता येऊ शकते, असेही रोहित शर्मा म्हणाला. 


नेमकी कुठे चूक झाली ? पाहा काय म्हणाला कर्णधार 


ओव्हलवरील परिस्थितीवर नाणेफेक जिंकून आम्ही चांगली सुरुवात केली होती. पहिल्या सत्रात 76 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेत गोलंदाजांनी भेदक मारा केला होता. त्यानंतर प्रभावी मारा करता आला नाही, त्याच वेळी ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केले. कठीण परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. विशेषकरुन ट्रेविस हेड याने पहिल्या डावात दमदार फलंदाजी केली. हेडच्या फलंदाजीने सामन्यावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व मिळवले होते, त्यामुळे सामन्यात परत येणं नेहमीच कठीण होतं. पण आम्ही चांगला प्रतिकार केला.. ऑस्ट्रेलियाचे मनापासून अभिनंदन..! आम्ही बरीच रणनिती केली... गोलंदाजी बदल, लाईन लेन्थ यासह अनेक विषयावर आमची चर्चा झाली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अशा गोष्टी घडू शकतात. 5 बाद 150 धावा, अशी अवस्था असताना अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर यांनी जोरदार प्रतिकार केला. ते खेळपट्टीवर स्थिरावले अन् चांगली भागिदारी केली. त्यामुळे सामन्यातील आपले आव्हान कायम राहिले, असे रोहित शर्मा म्हणाला. 


पुन्हा नव्या उमेदीने तयारीला लागू -


दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. पण विदेशी खेळपट्टीवर पुन्हा एकदा फलंदाजीत अपयश आले. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. पाचही दिवस खेळपट्टी चांगली होती, त्याचा फायदा आम्हाला घेता आला नाही. मागील चार वर्षात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दोन्ही फायनलमध्ये धडक मारली.  आम्ही आणखी चांगला खेळ करु शकलो असते. पण दोन वर्षांतील मेहनत घेतल्यामुळे फायनलला पोहचलो, पण पराभव पदरी पडला. हे आमच्यासाठी निराशाजनक आहे. आम्ही खूप चांगला प्रयत्न केलाय... अनेक खेळाडूंनी जिवाचे रान केलाय. जे झालं ते झालं.. आता नव्या उमेदीने पुढील विजेतेपदासाठी तयारीला लागू, असे रोहित शर्मा म्हणाला.