IND vs AUS, 4th Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये 2-1 ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघासाठी आता शेवटचा सामना 'करा किंवा मरो'चं आव्हान आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. ही कसोटी जिंकल्यावर टीम इंडिया मालिका जिंकेल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या (World Test Championship) फायनलमध्येही स्थान मिळवेल. मात्र भारतीय संघ हा सामना हरला तर एकीकडे मालिका बरोबरीत सुटणार असून दुसरीकडे WTC फायनलचं तिकीटही भारताच्या हाताबाहेर जाऊ शकते.

अहमदाबाद येथे झालेल्या कसोटी सामन्यांचा मागील रेकॉर्ड पाहिल्यास येथे सामना अनिर्णित करणं अवघड आहे, याचा अर्थ या मैदानात निकाल निश्चितच समोर येईल. जर भारतीय संघाचा याठिकाणी पराभव झाला तर डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या निकालावर भारताला अवलंबून राहावं लागेल.

श्रीलंकेला WTC फायनल खेळण्याची संधी 

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये इंदूर कसोटी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने WTC फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसऱ्या अंतिम फेरीसाठी टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात शर्यत सुरू आहे. अहमदाबाद येथे होणार्‍या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील शेवटचा सामना भारतीय संघाने जिंकला तर भारत थेट डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचेल, पण जर हा सामना अनिर्णित राहिला किंवा भारतीय संघ हरला, तर अशावेळी श्रीलंकेची WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी असेल. या स्थितीत श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवावा लागेल.

आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022-23 गुणतालिका:
 
संघ विजय पराभव अनिर्णीत एकूण गुण विजयी टक्केवारी
1. ऑस्ट्रेलिया 11 3 4 148 68.52
2. भारत 10 5 2 123 60.29
3.श्रीलंका 5 4 1 64 53.33
4. दक्षिण आफ्रीका 7 6 1 88 52.38
5. इंग्लंड 10 8 4 124 46.97
6. वेस्ट इंडीज 4 5 2 54 40.91
7. पाकिस्तान 4 6 4 64 38.10
8. न्यूझीलंड 2 6 3 36 27.27
9. बांगलादेश 1 1 10 16 11.11

बॉर्डर गावस्कर मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेत (BGT 2023) टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला चौथा सामना जिंकावा लागेल किंवा बरोबरीत सोडवावा लागेल. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. भारतीय संघ चौथी कसोटी हरला तर श्रीलंका आणि न्यूझीलंड (SL vs NZ) यांच्यातील कसोटीच्या निकालावर संघाला अवलंबून राहावे लागेल.

हे देखील वाचा-