Shreyas Iyer Ruled Out : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज श्रेयस अय्यर एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. आयसीसीने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. अय्यरच्या जागी बीसीसीआयने अद्याप कोणत्याही खेळाडूची निवड केलेली नाही. टीम इंडियाचे फिल्डिंग कोच टी दिलीप यांनी पत्रकार परिषदेत श्रेयस अय्यरबाबतची माहिती दिली. 
 
अहमदाबाद कसोटीच्या अखेरच्या दोन दिवस श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे मैदानात उतरता आले नव्हते. त्याला पाठदुखीचा त्रास होत होता. आता तो वनडे मालिकेतूनही बाहेर गेला. तो आयपीएलमध्ये खेळणार का? याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. श्रीलंकाविरोधात झालेल्या एकदिवसीय मालिकेलाही दुखापतीमुळे श्रेयस अय्यर मुकला होता. त्याशिवाय न्यूझीलंडविरोधातील वनडे मालिकेलाही त्याला मुकावं लागले होते. बेंगलोरमध्ये एनसीएमध्ये त्यानं फिटनेस टेस्ट पास केली होती, त्यानंतर त्याचं संघात पुनरागमन झालं होतं. पण पुन्हा एकदा त्याची दुखापतीने डोकं वर काढले आहे. आता तो वनडे मालिकेला मुकणार आहे.  आयपीएलबाबत मात्र साशंकता आहे. 
 





आयपीएलमध्ये खेळण्यावरही प्रश्नचिन्ह -


आयपीएल 2023 मध्ये श्रेयस अय्यरच्या खेळण्याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. अहमदाबाद कसोटीतही श्रेयस अय्यर फलंदाजीला आला नव्हता. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत सातत्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. अय्यरची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही. पण श्रेयस अय्यर एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. पण आता आयपीएलमध्ये खेळणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेय. अय्यर आयपीएलमधून बाहेर पडला तर कोलकात्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. 


वनडे मालिकेसाठी कशी आहे टीम इंडिया?


रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या (उप कर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.


कसे आहे वेळापत्रक ?-
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 मार्चपासून तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.  मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वनडे मालिकेतील दुसरा सामना 19 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. तिसरा सामना 22 मार्च रोजी चेन्नईत खेळवला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होतील.