India vs Australia 2nd ODI : ऑस्ट्रेलियाने अॅडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात (Adelaide Match) भारतावर दोन विकेट्सने विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या पराभवासह भारताचा अॅडलेडमध्ये 17 वर्षांनंतरचा पहिला वनडे पराभव ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 9 विकेट्स गमावून 264 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 22 चेंडू राखून आठ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य पूर्ण केले. शुभमन गिलसाठी (Shubman Gill) ही पहिली वनडे मालिका होती ज्यात त्याला कर्णधार म्हणून पराभव पत्करावा लागला.

Continues below advertisement

Adelaide Ind Vs Aus : शॉर्ट आणि कोनोलीच्या दमदार खेळीने बाजी पलटली

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात फारशी चांगली नव्हती. कर्णधार मिशेल मार्श 11 आणि ट्रॅव्हिस हेड 28 धावांवर माघारी परतले. त्या वेळी संघाचा स्कोअर फक्त 50 होता. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मॅथ्यू शॉर्टने मॅट रेनशॉसह 155 धावांची निर्णायक भागीदारी केली. शॉर्टने 78 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 74 धावा केल्या.

India vs Australia 2nd ODI : कोनोलीने मॅच विनिंग खेळी

रेनशॉ आणि अ‍ॅलेक्स केरी लवकर बाद झाल्याने कांगारूंची स्थिती पुन्हा डळमळली होती. 132 धावांवर चार विकेट्स गमावल्यावर भारताची पुनरागमनाची शक्यता वाढली, पण त्याच क्षणी युवा कूपर कोनोलीने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने केवळ 53 चेंडूंमध्ये नाबाद 61 धावा फटकावत संघाला विजय मिळवून दिला. त्याला मिचेल ओवेनची साथ मिळाली, त्याने फक्त 23 चेंडूत 36 धावा केल्या.

Continues below advertisement

Team India : भारतीय फलंदाजांचे प्रयत्न अपुरे

भारताकडून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके झळकावली. रोहितने 97 चेंडूत 73 धावा, तर अय्यरने 77 चेंडूत 61 धावा केल्या. अखेरीस अक्षर पटेलने 41 चेंडूत 44 धावांची झुंज दिली आणि संघाचा स्कोअर 264 पर्यंत नेला. मात्र हा स्कोअर ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर अपुरा ठरला.

Shubman Gill : जम्पा आणि बार्टलेटची प्रभावी गोलंदाजी

ऑस्ट्रेलियासाठी लेगस्पिनर अ‍ॅडम जम्पाने 60 धावांत 4 विकेट्स घेतल्या, तर वेगवान गोलंदाज जेव्हियर बार्टलेटने 39 धावांत 3 बळी टिपले. बार्टलेटने विराट कोहलीला शून्यावर बाद करून भारताला धक्का दिला. भारताचे मधले फळे कोसळले आणि संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

मालिकेत भारताची निराशाजनक स्थिती

या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली आहे. तिसरा सामना औपचारिक ठरणार असून, भारतासाठी तो प्रतिष्ठेचा लढा असेल. 

ही बातमी वाचा: