मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोविड-19 महामारीमुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या संघांचा निर्णय गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर घेतला जाईल, असं आयसीसीने सांगितलं. आयसीसीच्या या निर्णयामुळे भारतीय संघाला मोठं नुकसान झालं असून ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने अटी बदलण्यासाठी केलेल्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्याने संघाच्या गुणांची मोजणी होणार आहे.
आयसीसीने जारी केलेल्या नव्या क्रमावारीनुसार भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे, कारण ऑस्ट्रेलियाच्या गुणांची टक्केवारी 82.2 आहे जी भारताच्या 75 टक्क्यांपेक्षा फारच जास्त आहे. आयसीसीने संघांना सामन्यात मिळालेल्या विजयाच्या गुणांची टक्केवारी काढली आहे. ज्या मालिका कोविड-19 महामारीमुळे झाल्या नाहीत त्या अनिर्णित समजल्या गेल्या आहेत. आयसीसीच्या या नियमामुळे ऑस्ट्रेलियाला फायदा झाला आहे. तर भारताचं नुकसान झालं आहे.
आतापर्यंत भारतीय संघाचे चार मालिकांमध्ये 360 गुण आहेत आणि बदललेल्या नियमाच्या आधी भारतीय संघ क्रमवारीत प्रथम क्रमांकावर होता. तर तीन मालिकेमधील 296 गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. परंतु गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. 60.8 टक्क्यांसह इंग्लंडचा संघ या क्रमवारीत भारतानंतर तिसऱ्या स्थानावर आहे.
आता भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण इतर संघांकडेही आता वरच्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे. तर भारताविरुद्ध मायदेशी होणाऱ्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला फायदा होण्याची शक्यता आहे.
आता 2023 मध्ये आयसीसी महिला टी-20 विश्वचषक होणार यासोबतच 2022 मध्ये होणारा महिला टी-20 विश्वचषकही पुढे ढकलण्यात आला आहे. आता ही स्पर्धा 2023 मध्ये प्रस्तावित आहे. आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2023 मध्ये 9 ते 26 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे.