PBKS vs RCB Match CSK IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्स आज मैदानात उतरणार नसली, तरी धर्मशालामध्ये होणाऱ्या पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याकडे संपूर्ण चेन्नईच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. कारण या सामन्याचा निकाल थेट सीएसकेच्या आयपीएल 2026 प्लेऑफच्या आशांवर परिणाम करणार आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, चेन्नईचे चाहते आता नाईलाजाने आरसीबीच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध सात विकेट्सनी झालेल्या पराभवानंतर सीएसकेचे मोठे नुकसान झाले. संघ आता गुणतालिकेत 12 गुण आणि +0.027 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर घसरला आहे. त्यामुळे उरलेल्या दोन सामन्यांमध्ये चूक करण्याची अजिबात संधी राहिलेली नाही. एक पराभव म्हणजे थेट स्पर्धेबाहेर जाण्याचा धोका.
चेन्नईसमोर आता सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सविरुद्धचे दोनच सामने उरले आहेत. त्यामुळे सीएसकेची प्लेऑफची आशा आता स्वतःच्या कामगिरीसोबत इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून झाली आहे. विशेषतः आजच्या पीबीकेएस विरुद्ध आरसीबी सामन्यावर.
सीएसकेला का हवा RCBचा विजय?
आज जर आरसीबीने पंजाबचा पराभव केला, तर चेन्नईसाठी प्लेऑफचं समीकरण खूप सोपं होईल. कारण त्या परिस्थितीत पंजाब 13 गुणांवरच राहील आणि त्यांच्याकडे फक्त एकच सामना उरेल. म्हणजे पीबीकेएस जास्तीत जास्त 15 गुणांपर्यंतच पोहोचू शकतो.
अशावेळी सीएसकेने उरलेले दोन्ही सामने जिंकले, तर त्यांचे 16 गुण होतील आणि नेट रनरेटच्या गुंतागुंतीत न अडकता ते पंजाबला मागे टाकून थेट टॉप-4 मध्ये पोहोचू शकतात. त्यामुळे आज आरसीबीचा विजय म्हणजे चेन्नईसाठी मोठा दिलासा ठरू शकतो.
पंजाब जिंकला तर वाढणार टेन्शन
पण जर पंजाबने आरसीबीला हरवलं, तर चेन्नईसमोरचं संकट आणखी गडद होईल. पीबीकेएसचे 15 गुण होतील आणि त्यांची प्लेऑफमधील पकड मजबूत बनेल. अशा वेळी सीएसकेने दोन्ही सामने जिंकून 16 गुण मिळवले तरी त्यांचं भविष्य नेट रनरेटवर अडकू शकतं. त्यात पंजाबसोबत हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील स्पर्धाही निर्णायक ठरू शकते. सर्वात मोठी अडचण म्हणजे, पंजाब जिंकला आणि सीएसकेने उरलेल्या दोन सामन्यांपैकी एक जरी गमावला, तर त्यांचे फक्त 14 गुण होतील आणि प्लेऑफचं स्वप्न जवळपास संपुष्टात येईल.
सीएसकेसाठी सर्वात महत्त्वाचं काय?
आजच्या पीबीकेएस विरुद्ध आरसीबी सामन्याचा निकाल महत्त्वाचा असला, तरी चेन्नईसाठी खरं समीकरण अगदी स्पष्ट आहे, उरलेले दोन्ही सामने जिंकणं अनिवार्य आहे. एलएसजीविरुद्धच्या मोठ्या पराभवामुळे त्यांचा नेट रनरेट आधीच खराब झाला आहे. त्यामुळे 14 गुणांवर स्पर्धा संपवली, तर इतर अनेक निकालांवर अवलंबून राहावं लागेल आणि त्या शक्यता खूपच कमी आहेत. म्हणूनच आता सीएसकेसाठी प्रत्येक सामना हा “करो या मरो” बनला आहे, तर आज धर्मशालामध्ये आरसीबीच्या विजयासाठी चेन्नईचे चाहते मनोमन प्रार्थना करताना दिसणार आहेत.
हे ही वाचा -
