Asia Cup 2023, IND Vs NEP Live Score : भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानविरोधात प्रथम फलंदाजी केल्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतल्याचे राहित शर्माने नाणेफेकीवेळी सांगितले. पाकिस्तानविरोधात इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार फलंदाजी केली, असे म्हणत रोहित शर्मा याने कौतुक केले. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह कौटंबिक कारणामुळे मायदेशात परतला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. दरम्यान, नेपाळचा कर्णधार रोहित यानेही प्रथम गोलंदाजी करण्याची इच्छा असल्याचे नाणेफेक गमावल्यानंतर सांगितले. त्याशिवाय नेपाळसाठी आजचा दिवस सर्वात मोठा असल्याचेही सांगितले. नेपाळच्या संघातही एक बदल करण्यात आला आहे. 


पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाला.त्यामुळे भारताला एका गुणांवर समाधान मानावे लागले. आता आशिया चषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला नेपाळविरोधात विजय गरजेचा आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर भारतीय संघ दोन गुणांसह सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. 


मोहम्मद शामीला संधी - 


जसप्रीत बुमराह उपलब्ध नसल्यामुळे रोहित शर्माने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याला संधी दिली आहे. मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. त्यांच्या जोडीला हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर हे अष्टपैलू खेळाडू असतील. त्याशिवाय रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव फिरकीची धुरा सांभाळतील.


भारतीय संघाचे 11 शिलेदार कोणते ?


शुभमन गिल, रोहित शर्मा  (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह


नेपाळच्या संघात कोण कोण ?


 कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शारकी, सोमपाल कामी, गुलशन झा, दिपेंद्र सिंह अर्री, कुशप माला, संदीप लमिछाने, करन केसी, ललित राजबांसी.



भारतासाठी आता करो या मरोची लढाई - 


पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता भारतापुढे करो या मरोची स्थिती झाली आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळचा पराभव करणं अनिवार्य आहे. अथवा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. नेपाळने अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला विजय अनिवार्य आहे. पाकिस्तानविरोधात नेपाळच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला होता. त्यामुळे नेपाळ संघाला हलक्यात घेण्याची चूक टीम इंडिया करणार नाही.  भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये 4 सप्टेंबर रोजी पल्लेकेले स्टेडिअमवर अखेरचा साखळी सामना होणार आहे. यातील विजेता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल.