...तर बीसीसीआयला प्रत्येक कसोटीमागे 50 कोटीचं नुकसान
एबीपी माझा वेब टीम | 04 Nov 2016 11:13 PM (IST)
मुंबई: जस्टिस लोढा समितीनं घातलेल्या आर्थिक निर्बंधांनंतरही भारत आणि इंग्लंड संघांमधली मालिका ठरल्याप्रमाणेच खेळवली जाईल असे संकेत इंग्लंड क्रिकेट बोर्डातील सूत्रांनी दिले आहेत. पण ईसीबीनं हा दौरा रद्द करण्याचं ठरवलं, तर बीसीसीआयला प्रत्येक कसोटीमागे 50 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. ही मालिका रद्द झाली तर त्यासाठी बीसीसीआयच जबाबदार राहील असं जस्टिस लोढा समितीनं ठणकावलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 21 ऑक्टोबरच्या आदेशानुसार बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करत नाहीत, तोवर या निर्बंधांत कोणतीही सूट देण्यास देण्यास लोढा समिती तयार नाही. या प्रतिज्ञापत्रातून ठाकूर आणि शिर्के यांनी लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी बीसीसीआयला आणखी नेमका किती अवधी हवा आहे, हे स्पष्ट करावं तसंच असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. त्यासाठी बीसीसीआयला पाच नोव्हेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला होता.