महिला आशिया टी-20 चषकावर बांगलादेशचं नाव, भारताचा पराभव
एबीपी माझा वेब टीम | 10 Jun 2018 05:08 PM (IST)
ट्वेन्टी ट्वेन्टीच्या इतिहासात भारताने आजवर सहावेळा आशिया चषक जिंकला आहे. त्यामुळे बांगलादेशच्या महिलांचा पराक्रम खूपच मोठा मानला जात आहे.
क्वालालंपूर : बांगलादेशने अखेरच्या चेंडूवर भारताचा तीन विकेट्सनी पराभव करून, महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. ट्वेन्टी ट्वेन्टीच्या इतिहासात भारताने आजवर सहावेळा आशिया चषक जिंकला आहे. त्यामुळे बांगलादेशच्या महिलांचा पराक्रम खूपच मोठा मानला जात आहे. क्वालालंपूरमधल्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारतीय महिलांना नऊ बाद 112 धावांत रोखलं होतं. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या 56 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. जहानआरा आलमने अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेऊन बांगलादेशला सात विकेट्सच्या मोबदल्यात 113 धावांचं लक्ष्य गाठून दिलं. बांगलादेशच्या या कामगिरीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या यशात प्रशिक्षक अंजू जैन, सहप्रशिक्षक देविका पळशीकर आणि फिजियो अनुजा दळवी या तीन भारतीयांचा मोलाचा वाटा आहे.