अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीत विजयासाठी भारताला तीन विकेट्सची गरज आहे. उपाहारानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला बुमराने षटकाच्या पहिल्याच बॉलवर झटका दिला. बुमराने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला 41 धावांवर माघारी धाडलं. ही ऑस्ट्रेलियाची सातवी विकेट होती. पाचव्या दिवशी उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 बाद 186 धावा केल्या होता.


4 बाद 104 धावांवरुन पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताच्या ईशांत आणि बुमराने झटके दिले. ईशांतने ट्रॅव्हिस हेडला 14 धावांवर बाद केलं. त्यानंतर बुमराने शॉन मार्शला 60 धावांवर माघारी पाठवलं. तर उपाहारानंतर बुमरानेच टिम पेनची विकेट घेतली.

अॅडलेड कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता भारताला विजयासाठी तीन विकेटसची गरज आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे.

भारतातर्फे जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि आर अश्विनने प्रत्येकी 2 तर ईशांत शर्माने 1 विकेट घेतली.

चार दिवसात काय घडलं?

ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावाची सुरुवातही चांगली झाली नाही. सलामीवीर फिंचला 11 धावांवर अश्विनने बाद केले तर त्यांनतर आलेल्या ख्वाजाला अवघ्या 8 धावांवर अश्विननेच तंबूत धाडले. हॅरिसने 26 धावांची खेळी केली तर हॅन्डस्कॉम्ब 11 धावांवर बाद झाला. या दोघांनाही शमीने बाद केले.

त्याआधी पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या पुजारानं दुसऱ्या डावातही नऊ चौकारांसह 71 धावांचं योगदान दिलं. तर रहाणेने सात चौकारांसह 70 धावांची खेळी उभारली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे टीम इंडियाला तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक सहा फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्कनं तीन आणि जॉश हेजलवूडनं एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांत आटोपला होता. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडने एकाकी झुंज देताना सहा चौकारांसह 72 धावांची महत्त्वपूर्ण खेळी उभारली होती. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 15 धावांचीच आघाडी घेता आली होती.

टीम इंडियाचा पहिला डाव 250 धावांत आटोपला होता. भारतातर्फे चेतेश्वर पुजाराने 123 धावांची खेळी केली होती. पहिल्या डावात पुजारा वगळता एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती.