सामना संपल्यानंतर हॉटेलकडे जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या बसच्या दिशेनं एक मोठा दगड भिरकावला.
australian team bus attacked in india
गुवाहटी (आसाम): ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर काल रात्री उशिरा दगडफेक झाली. अज्ञाताने सामना संपल्यानंतर हॉटेलकडे जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या बसच्या दिशेनं एक मोठा दगड भिरकावला. ज्यात बसचं नुकसान झालं. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरोन फिंचने याबाबत ट्विट करुन माहिती दिली. दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ हॉटेलकडे जात होता. त्यावेळी बसवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये बसची काच फुटली. या हल्ल्याचा फोटो अॅरॉन फिंचने ट्विट केला. “हॉटेलकडे जात असताना टीम बसच्या खिडकीवर दगड मारण्यात आला. हे खूपच भीतीदायक होतं”, असं फिंचने म्हटलं आहे. https://twitter.com/AaronFinch5/status/917813800866164736 गुवाहटीमध्ये सात वर्षांनी काल आंतरराष्ट्रीय सामना झाला. यापूर्वी या मैदानावर 2010 मध्ये सामना खेळवण्यात आला होता. सात वर्षांनी या मैदानात विजय पाहायला मिळेल, अशी आशा चाहत्यांना होती, मात्र पराभवामुळे चाहते नाराज झाले. दरम्यान अरॉन फिंचचं ट्विट ऑस्ट्रेलियाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने रिट्विट केलं आहे. सध्या याबाबत टीम इंडिया, बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय गुवाहाटी टी ट्वेण्टी ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा आठ विकेट्स राखून पराभव केला. टीम इंडियानं दिलेलं 119 धावांच आव्हान कांगारूंनी 15 षटक आणि 3 चेंडूत पूर्ण केलं. मॉइजेस हेनरिकेज आणि ट्रॅविस हेड हे कांगारूंच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य 109 धावांची भागिदारी केली. हेनरिकेजनं आपल्या अर्धशतकी खेळीत 46 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह नाबााद 62 धावा फटकावल्या. तर हेडनं 34 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह धावांची खेळी केली. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत कांगारूंनी आता 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्याआधी टीम इंडियाचा डाव अवघ्या 118 धावात कोसळला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनड्रॉफनं भेदक गोलंदाजी करताना केवळ 21 धावा देत टीम इंडियाच्या 4 फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर अॅडम झंपानं त्याला सुरेख साथ देत 19 धावात दोन विकेट्स घेतल्या. तर नाथन कुल्टर नाईल, अॅन्ड्रू टाय आणि मार्कुस स्टॉयनिसनं प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतातर्फे केदार जाधवनं सर्वाधिक 27 धावांचं योगदान दिलं.