लंडन : इंग्लंडमधल्या लहरी पावसाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाची पंचाईत करून ठेवली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धचे पहिले दोन्ही साखळी सामने पावसामुळं रद्द झाले आहेत. त्यामुळे अ गटातून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक मारायची, तर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे.


उभय संघांमधला हा सामना शनिवार, 10 जूनला बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन्ही साखळी सामन्यांमधून प्रत्येकी एकेका म्हणजे दोन गुणांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळं उपांत्य फेरीच्या शर्यतीत दाखल व्हायचं, तर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडला हरवून दोन गुणांची वसुली करावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश संघांमधला कार्डिफचा सामना सोमवारी पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे उभय संघांना एकेका गुणावर समाधान मानावं लागलं. ऑस्ट्रेलियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीत रद्द झालेला हा दुसरा सामना ठरला.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला तर कोणताही सामना न खेळता मालिकेतून बाहेर पडणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ असेल.

याआधी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांत शुक्रवारी बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यावर पावसानं पाणी फेरलं होतं. त्यानंतर सोमवारी ऑस्ट्रेलिया-बांगलादेश सामना पावसात वाहून गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पाच्या प्रभावी आक्रमणासमोर बांगलादेशचा अख्खा अवघ्या 182 धावांत आटोपला.

स्टार्कने 29 धावांत चार, तर झॅम्पाने 13 धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाला 16 षटकांत एक बाद 83 धावांची मजल मारून दिली होती. या सामन्यात आणखी चार षटकं झाली असती तर डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आलं असतं.