VVS Laxman, Interim Head Coach : आशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धेपूर्वीच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता संघ कोणाच्या प्रशिक्षणाखाली ही भव्य स्पर्धा खेळणार असा प्रश्न उपस्थित होत होता. राहुल लवकरच कोरोनातून सावरुन संघासोबत येईल अशी आशा व्यक्त होत असली तरी बीसीसीआयनं (BCCI) भारतीय संघाचा हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याची निवड केली आहे. बीसीसआयनं याबाबत नुकतीच अधिकृत घोषणा केली आहे.


लक्ष्मण याने नुकतीच भारत विरुद्ध झिम्बाब्वे एकदिवसीय मालिकेमध्ये भारताचा कोच म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तीन सामन्यांची एकदिवसीय खेळण्यासाठी काही दिवसांपूर्वी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर (India tour of Zimbabwe) रवाना झाला होता. या दौऱ्यात नियमित मुख्यप्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) विश्रांती देण्यात आली होती. यामुळं या दौऱ्यात भारताचा लक्ष्मण याला (VVS Laxman) भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाहनं (Jay Shah) याबाबत माहिती दिली होती. यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही लक्ष्मण कोच म्हणून संघासोबत होता. या दोन्ही मालिका भारताने जिंकल्या होत्या. 






राहुल लवकरच संघासोबत येईल - रवी शास्त्री


संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी राहुल द्रविड कधी संघासोबत परतेल याबाबत माहिती देताना ते म्हणाले, "मला वाटत नाही की यामुळे अधिक फरक पडणार आहे, आता याला कोविड-19 म्हणत, असले तरी हा एक तापाचाच प्रकार आहे. तीन-चार दिवसांत तो बरा होईल आणि तो संघासोबत सामील होईल." ओव्हल येथे इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान शास्त्री यांनी स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचा अनुभव सांगितला. कोविड-19 साठी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने, सावधगिरीचा उपाय म्हणून गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना त्या वेळी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "गेल्या वर्षी जेव्हा मला कोरोना झाला होता तेव्हा मी सहा दिवसांनंतर मी बरा होऊन पुन्हा संघासोबत परतलो होतो.  त्यामुळे राहुलही नक्कीच संघासोबत परतेल.''


आशिया चषकाला 27 ऑगस्टपासून सुरुवात


आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जाणार आहे. दरम्यान, सुपर 4 साठी 6 सामने खेळवले जाणार आहेत. सुपर फोरचा पहिला सामना 3 सप्टेंबरला शारजहामध्ये होणार आहे. तर त्याचा शेवटचा सामना 9 सप्टेंबरला म्हणजे फायनलच्या दोन दिवस आधी होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. सुपर फोरमधील पहिला सामना वगळता बाकीचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. 


हे देखील वाचा-