IND vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा सामना रविवारी (4 सप्टेंबर) दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात पार पडणार आहे. या सामन्यात दोन्ही संघातील काही महत्त्वाचे गोलंदाज चांगलं प्रदर्शन करु शकतात. ज्याच्यांमुळे सामना अधिक चुरशीचा होऊ शकतो. तर नेमके कोणते फलंदाज या सामन्यावर आपली छाप सोडू शकतात ते पाहूया...


भुवनेश्वर कुमार


सध्या आशिया कपमधील भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज म्हणजे भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar). त्याने आशिया कपमध्येही आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 4 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला हाँगकाँगविरुद्धही यश मिळाले. सुपर-4 सामन्यातही भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध आपल्या गोलंदाजीने छाप सोडू शकतो. भुवनेश्वर कुमारने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला स्वस्तात माघारी धाडलं होतं. आता या सामन्यातही बाबरला बाद करु शकतो.


नसीम शाह


पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहने आशिया चषक स्पर्धेत भेदक गोलंदाजी केली आहे. शाहीन आफ्रिदीच्या अनुपस्थितीत त्याने गोलंदाजीची कमान सांभाळली आहे.  भारत आणि हाँगकाँग या दोन्ही संघांविरुद्ध विकेट्स घेण्यात त्याने यश मिळवलं आहे. त्याचे वेगवान चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना चकित करत असल्याने आता रविवारच्या भारताविरुद्धच्या सामन्यातही त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल.


युजवेंद्र चहल


भारतीय संघाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहलकडून पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4मध्ये चांगली कामगिरी करण्याची चाहत्यांना खूप आशा आहे. भारतासाठी महत्वाच्या सामन्यांमध्ये चहल नेहमीच प्रभावी ठरतो. आता देखील रविवारी पाकिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजी करण्याची आशा आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चहलला कोणतेही यश मिळाले नसले तरी त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये फलंदाजांना जास्त धावा करू दिल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धही तो उत्तम कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.


शादाब खान


पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू आणि उपकर्णधार शादाब खान भारतासाठी मोठी समस्या ठरु शकतो. पहिल्या सामन्यातही त्याने भारतीय फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले होते. त्याचबरोबर हाँगकाँगविरुद्ध त्याने 4 विकेट्स घेतल्या. शादाबची खास गोष्ट म्हणजे तो गोलंदाजीसोबतच फलंदाजीसह संघासाठी उपयुक्त आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 19 धावा दिल्या होत्या. त्यामुळे रविवारच्या सामन्यातही तो चांगली कामगिरी करु शकतो.


अक्षर पटेल


रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेल भारतीय संघाला खूप फायदा देऊ शकतो. दुखापतग्रस्त रवींद्र जाडेजाच्या जागी अक्षर पटेल संघात सामील झाला आहे. तो त्याच्या फलंदाजीबरोबरच गोलंदाजीनेही पाकिस्तानविरुद्ध संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. भारतीय चाहत्यांनाही त्याच्याकडून मोठ्या आशा आहेत.


हे देखील वाचा-