दुबई : आशिया चषकाच्या अंतिम मुकाबल्यात बांगलादेशने विजयासाठी टीम इंडियासमोर 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर बांगलादेशच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. 48.3 षटकांमध्ये बांगलादेशच्या सर्वबाद 222 धावा झाल्या.


नाणेफेक जिंकून भारताने बांगलादेशला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. सलामीच्या लिटन दास आणि मेहिदी हसनने 120 धावांची दमदार भागिदारी रचली होती. पण केदार जाधवने हसनचा काटा काढत बांगलादेशी फलंदाजीला खिंडार पाडलं. भारताकडून कुलदीप यादवने तीन, केदार जाधवने दोन तर यजुवेंद्र चहलने एक विकेट घेतली.

एका बाजूने बांगलादेशचे फलंदाज बाद होत असताना लिटन दासने एक बाजू लावून धरली. त्याने 12 चौकार आणि एका षटकारासह 121 धावांची खेळी उभारली. दासचं वन डे कारकीर्दीतलं हे पहिलं शतक ठरलं.

बांगलादेशवर मात करुन भारत सातव्यांदा आशिया चषक काबीज करण्यासाठी उत्सुक आहे. 2016 मध्ये आशिया चषकाच्या अंतिम फेरीत बांगलादेशला हरवून भारताने सहावा आशिया चषक जिंकला होता. बांगलादेश तिसऱ्यांदा अंतिम फेरीत दाखल झाला आहे, मात्र त्यांना एकदाही चषक उंचावण्याची संधी मिळाली नाही.