दुबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल झालेल्या आशिया चषकातील सामना भारताने एकहाती जिंकला. क्रिकेट चाहत्यांना काल दोन्ही देशातील द्वंद्व पाहायला मिळालं नाही. पाकिस्तानी संघ अवघ्या 162 धावांत गुंडाळल्यामुळे भारताने हा सामना 8 विकेट्स राखून जिंकला. त्यामुळेच या सामन्यात म्हणावी तशी रंगत आली  नाही. भारताने पाकिस्तानचा 126 चेंडू राखून म्हणजेच 21 षटकं राखून 2 विकेट्सच्या मोबदल्यात हा सामना जिंकला. पाकिस्तानवरील या विजयात टीम इंडियातील चार खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली. भुवनेश्वर आणि केदार जाधव या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानी फलंदाजांना सुरुवातीलाच दणके दिले. त्यानंतर केदार जाधवने छोटा पॅक मोठा धमाका करत, पाक फलंदाजीचे कंबरडे मोडले. भुवनेश्वर कुमार, केदार जाधव आणि जसप्रीत बुमरानं प्रभावी मारा करुन पाकिस्तानचा अख्खा डाव 43 षटकं आणि एका चेंडूंत 162 धावांत गुंडाळला. भारताकडून केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी तीन-तीन विकेटस काढून सर्वात प्रभावी मारा केला. जसप्रीत बुमरानं दोन आणि कुलदीप यादवनं एक विकेट मिळवली. (आशिया कप : दुखापतग्रस्त हार्दिक पंड्या टीम इंडियातून बाहेर)
रोहित शर्मा आणि शिखर धवनचा हल्लाबोल पाकिस्तानचं तुटपुंजं आव्हान घेऊन भारताचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन मैदानात उतरले. पाकिस्तानी गोलंदाजांनी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलप्रमाणेच गोलंदाजी केली. मात्र यावेळी रोहित आणि धवन डगमगले नाहीत. दोघे आधी सेट झाले, मग अंदाज घेतला आणि धुलाई सुरु केली. दोघांनी 86 धावांची सलामी दिली. रोहितने अवघ्या 36 धावांत अर्धशतक झळकावलं. मात्र 52 धावांवर असताना शादाब खानने त्याला त्रिफळाचीत केलं. दुसरीकडे शिखर धवननेही त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी केली. धवनने 6 चौकार आणि 1 षटकारासह 46 धावा ठोकल्या.
धवन बाद झाला त्यावेळी भारताला 30 षटकात अवघ्या 60 धावांची गरज होती. त्यावेळी अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक यांनी खेळाची सूत्रं हाती घेतली आणि विजयी ध्वज फडकावला. दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पुढचा सामना 23 सप्टेंबर रोजी होणार आहे.
संबंधित बातम्याहार्दिक पंड्या गोलंदाजी करताना कोसळला, स्ट्रेचरवर नेण्याची वेळ  INDvsPAK : भारताचा पाकिस्तानवर आठ विकेट्स राखून एकतर्फी विजय  आशिया कप : दुखापतग्रस्त हार्दिक पंड्या टीम इंडियातून बाहेर