हैदराबाद : टीम इंडियाने हैदराबाद कसोटीत बांगलादेशला 208 धावांनी धूळ चारली. विराट कोहलीच्या टीम इंडियाचा हा सलग सहावा मालिका विजय आहे.


हैदराबाद कसोटीत भारताच्या तीन गोलंदाजांनीच बांगलादेशचा दुसरा डाव गुंडाळून टाकला.

रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी चार-चार विकेट्स तर इशांत शर्माने दोन विकेट घेत, बांगलादेशला 250 धावांत गुंडाळलं.

अश्विनने सलामीवीर तमीम इक्बाल, मोमीनल हक, कर्णधार मुश्फिकर रहीम आणि तस्कीन अहमद यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

तर रवींद्र जाडेजाने सौम्या सरकार, शाकीब अल हसन, मेहदीहसन मिराझ आणि तैजुल इस्लाम यांचा काटा काढला

इशांत शर्माने धोकादायक महमुदुल्ला आणि साबीर रहमानला तंबूत धाडून टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

याआधी पहिल्या डावातही अश्विन आणि जाडेजाने प्रत्येकी दोन, तर इशांतने एक विकेट घेतली होती.

भारताचा दणदणीत विजय

हैदराबाद कसोटीत टीम इंडियाने बांगलादेशवर 208 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतानं बांगलादेशविरुद्धची ही एकमेव कसोटी जिंकून, सलग सहावी कसोटी मालिका जिंकण्याचाही पराक्रम गाजवला.

या कसोटीत भारतानं बांगलादेशला विजयासाठी 459 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं चौथ्या दिवसअखेर तीन बाद 103 धावांची मजल मारली होती. त्यामुळं बांगलादेशला अखेरच्या दिवशी विजयासाठी 356 धावांची आवश्यकता होती तर भारताला विजयासाठी सात विकेट्स हव्या होत्या.

बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चहापानापर्यंत विजयासाठी संघर्ष करायला लावला. अखेर बांगलादेशचा डाव 250 धावांवर आटोपला आणि टीम इंडियानं 208 धावांनी विजय साजरा केला.

संबंधित बातम्या

विराटने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला !

टीम इंडियाचा बांगलादेशवर विजय