साहानं नुकतंच न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत तिन्ही सामने मिळून 452 षटकं यष्टीरक्षण केलं होतं. तसंच ईडन गार्डन्सवर दोन अर्धशतकं झळकावून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि सामनावीराचा किताबही पटकावला होता. महेंद्रसिंग धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर साहानं एक यष्टीरक्षक म्हणून आपल्यावरची जबाबदारी चोख बजावली आहे.
आता 9 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी साहा ताजातवाना राहणं गरजेचं आहे. त्यामुळंच कुंबळेनं त्याला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळं साहानं बंगालच्या उत्तर प्रदेश आणि पंजाबविरुद्धच्या लढतींतून माघार घेतली आहे. 27 ते 30 ऑक्टोबरदरम्यान रेल्वेविरुद्धच्या लढतीत साहा पुन्हा मैदानावर उतरेल.