बीजिंग : सीमेवर शांतता राखण्यासाठी भारत आणि चीन यांनी सीमा प्रश्न संवादातून सोडवावा, असे मत चीनचे राजदूत सून वेईडोंग यांनी व्यक्त केले.चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग ११ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वेईडोंग यांनी ही माहिती दिली.


चीनचे अध्यक्ष शी जिनिपिंग हे 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत आणि चीन कडून आज (बुधवारी) या भेटीची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भारत आणि चीन यांनी याआधी प्रादेशिक पातळीवर अनेक प्रश्न सोडवले आहेत. सीमावादामुळे दोन देशांतील संबंध बिघडू नये, याची काळजी दोन्ही देशांनी घ्यायला हवी, असे वेईडोंग म्हणाले. भारत आणि चीनमध्ये सध्या सीमाप्रश्नांवर वादविवाद सुरु आहेत. दोन्ही देशांमध्ये 3488 किमी नियंत्रण सीमा रेषेवरून(एलओसी)वाद आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले आहेत. इम्रान खान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. या दौऱ्यात ते दोन देशांतील संबध आणि प्रादेशिक प्रश्नांवर चर्चा करणार आहेत.

जम्मू-काश्मीरबद्दल चीनची भूमिका स्पष्ट असून शेजारील देशांमध्ये वादविवाद होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. भारत आणि पाकिस्तानने काश्मीर मुद्दा संवादातून सोडविला पाहिजे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी देखील म्हटले होते.