सेंट पीटर्सबर्ग : भारतासोबत रशियाचं विश्वासाचं नातं आहे. अनेक संवेदनशील क्षेत्रांमध्ये रशियाचा जगभरात भारतासारखा मित्र नाही. भारत सर्वात जवळच्या देशांपैकी एक आहे, असं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे.


पाकिस्तान किंवा अन्य देशांसोबत आमचे संबंध असले तरी भारतासोबतच्या संबंधांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. पाकिस्तानसोबत रशियाचे जवळचे लष्करी संबंध आहेत, हा मुद्दा खोडून काढत असं काहीही नसल्याचं पुतीन म्हणाले.

जगभरातील निवडक वृत्तसंस्थांच्या संपादकांच्या प्रश्नांना पुतीन यांनी उत्तरं दिली. मात्र काश्मीर प्रश्नावर थेट उत्तर देणं पुतीन यांनी टाळलं. काश्मीरमध्ये पाकिस्तान दहशतवादाला बळ देतं का नाही, त्याचं आकलन तुम्हीच करावं, असं उत्तर पुतीन यांनी दिलं.

भारताचे रशियासोबत जवळचे संबंध आहेत, त्यामुळे इतर देशांसोबतचे संबंध मर्यादित ठेवावेत असं म्हणणं हास्यास्पद आहे. पाकिस्तानसोबत रशियाचे जवळचे संबंध बिलकुल नाहीत. मात्र पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधांमुळे भारत आणि रशिया यांच्यात होणाऱ्या व्यापारावर कसलाही परिणाम होणार नाही, असंही पुतीन यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकणार का, असाही प्रश्न पुतीन यांना विचारण्यात आला. दहशतवादाच्या मुद्द्यांवर रशिया नेहमी भारतासोबत असेल. मात्र पाकिस्तान आपल्या देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे, असंही पुतीन म्हणाले.